चालू शैक्षणिक वर्षापासून पहिली ते बारावीसाठी १०० टक्के पाठ्यक्रम लागू

मुंबई,२४ जून  /प्रतिनिधी :- शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून इयत्ता पहिली ते बारावी साठी 100 टक्के पाठ्यक्रम लागू करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

मार्च 2020 पासून कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये शाळा ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू होत्या. तसेच प्रत्यक्ष शाळेत अध्ययन-अध्यापन मर्यादित स्वरूपात होत असल्याने या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांवरील अध्ययनाचा ताण कमी व्हावा यादृष्टीने शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये इयत्ता पहिली ते 12 वी चा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्यात आला होता. तसेच ही परिस्थिती कायम राहिल्याने कमी केलेला पाठ्यक्रम 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठीदेखील कायम ठेवण्यात आला होता.