बंडखोर परतले तर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल – संजय राऊत

मुंबई : बंडखोर आमदारांनी २४ तासात गुवाहाटीहून मुंबईला परत यावे. याठिकाणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा करावी. आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडू, असे आश्वासन खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी दिले.

‘वर्षा’ निवासस्थानात आज शिवसेना नेते आणि आमदारांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, बाहेर असलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना जर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडावे आणि वेगळा विचार करावा असे वाटत असेल तर तोदेखील विचार करू. मात्र, तुम्ही आधी २४ तासात मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी. मुंबईत आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चा करावी, असे आवाहन राऊत यांनी यावेळी केले.

बंडखोर आमदारांनी पत्रकारांना व्हॉट्सअॅपवर हॉटेलमधील फोटो, व्हिडिओ पाठवण्यापेक्षा प्रत्यक्षात येऊन चर्चा करावी. आमचा गुवाहाटीमधील २१ आमदारांसोबत संपर्क झाला असल्याची माहिती यावेळी राऊत यांनी दिली. राज्याबाहेर गेलेले शिवसेनेचे २०-२५ आमदार पुन्हा शिवसेनेत येतील असा विश्वास आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी इच्छा असेल तर तुम्ही प्रत्यक्षात भेटून चर्चा करावी. मात्र, त्यांचा हा बहाणा असल्याचे राऊत यांनी सांगितले.