फडणवीसांचा करिश्मा कायम

मुंबई : विधान परिषदेच्या १० जागांसाठी झालेल्या निवडणूकीमध्ये भाजपला ५ जागांवर तर महाविकास आघाडीला ५ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने प्रसाद लाड यांच्यासाठी विधान परिषद निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असताना कमी संख्याबळ असतानाही प्रसाद लाड विजयी झाले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा करिश्मा कायम असल्याचे राज्यसभेपाठोपाठ झालेल्या विधान परिषद निवडणूकीतही पहावयास मिळाला आहे.

भाजपकडून राम शिंदे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आणि उमा खापरे तर महाविकास आघाडीतील शिवसेनेकडून सचिन अहिर, आमश्या पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, रामराजे निंबाळकर हे पहिल्याच फेरीत विजयासाठी आवश्यक असणारी मते मिळवून विजयी झाले आहेत.

काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे विजयी झाले असून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप पराभूत झाले आहेत. विधान परिषद निवडणूक होण्यापूर्वीच माजी मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाई जगताप यांनी उमेदवारी मागे घ्यावी असे आवाहन करताना भाई जगताप पराभूत होणार असल्याचे भाकित वर्तविले होते. महाविकास आघाडीला समीकरणाच्या गणितात भाजपने पुन्हा एकवार धोबीपछाड दिल्याने भाजपचे आमदार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये निकाल जाहिर होताच राज्यभरात जल्लोष साजरा केला जात आहे.