राज्यात ३८८३, तर मुंबईत २०५४ नवे कोरोना रुग्ण

मुंबई : गेल्या तीन दिवसांच्या तुलनेत राज्यातील कोरोनाच्या आकडेवारीत शनिवारी काहीशी घट झाल्याचे दिसून आले. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या ३ हजारांच्या आत आली असून आज ३८८३ नव्या रुग्णांची भर पडली आहे, तर आज दिवसभरात २८०२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबईत सर्वाधिक २०५४ रुग्णांची भर पडली आहे.

दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज एकूण दोन कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर हा १.८६ टक्के इतका झाला, तर आतापर्यंत राज्यामध्ये ७७,६१,०३२ कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.८५ टक्के इतके झाले आहे.

राज्यात आज एकूण २२,८२८ सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक म्हणजे १३,६१३ इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये ४८६९ सक्रिय रुग्ण आहेत. देशात १३ हजार २१६ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात सर्वाधिक नवीन रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीतील रुग्ण संख्येचा क्रमांक लागतो.

देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या वाढून ६८ हजारांवर पोहोचली आहे. सध्या भारतात ६८,१०८ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासांत ८,१४८ रुग्णांनी कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात केली आहे. देशातील सक्रिय रुग्णांचा सरासरी दर ०.१६ टक्के आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.६३ टक्क्यांवर पोहोचले आहे. देशात कोरोना महामारी सुरू झाल्यास आतापर्यंत एकूण ४ कोटी २६,९०,८४५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.