महाविकास आघाडीत एकजूट असून मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे मतदान करू – अजितदादा पवार

मुंबई,१८ जून  /प्रतिनिधी :-  विधान परिषद निवडणुकीत आम्ही सगळेजण मनापासून विजयासाठी प्रयत्न करत आहोत. शिवसेनेकडे दोन सदस्य निवडून आणण्याएवढी मते आहेत. आमच्या दोन सदस्यांना न्यायालयाने मतदानाची परवानगी दिली नाही, त्यामुळे आमच्याकडे ५१ आमदारांची संख्या आहे. एखादं मत राज्यसभेच्या निवडणुकीत झालं त्याप्रमाणे बाद ठरवलं जाऊ शकतं. त्यामुळे त्याची खबरदारी घेतली जात आहे. कोटा जास्त देण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

अजितदादा पवार पुढे म्हणाले, शिवसेनेचे दोन्ही उमेदवार व्यवस्थित निवडून येतील. शिवसेनेने अपक्ष आमदारांना मंत्री केले आहेत ते शिवसेनेकडेच जातील. एक – दोन आकडे आमच्या उमेदवारांना घेतले तर तीन – चार आकडे कुणाला द्यायचे हे ठरायचे आहे. महाविकास आघाडीत एकजूट असून अपक्षांना आम्ही फोन केला होता त्याबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली होती. ज्यांना फोन केला होता त्यांनी मुख्यमंत्री सांगतील त्याप्रमाणे आम्ही मतदान करु असे सांगितले आहे, अशी विधानपरिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत अजितदादा पवार यांनी भूमिका स्पष्ट केली.

केंद्रीय यंत्रणांकडून कॉल केले जात आहेत याबद्दल आमच्या आमदारांनी आम्हाला अद्याप सांगितले नाही असेही अजित पवार यांनी कॉंग्रेसच्या आमदारांना करण्यात आलेल्या कॉलवर बोलताना स्पष्टीकरण दिले. आमदार निवडून देत असताना आपापला कोटा आहे. परंतु आम्हाला संख्या कमी पडतेय त्याचे नियोजन सुरू आहे. बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांना सर्वचजण जाऊन भेटले आहेत, मात्र जे स्वतंत्र विचाराचे लोक आहेत त्यांना कोण भेटत असतील आणि मतदान करा सांगत असतील तर त्यात चुकीचे काही नाही. आता मतदानाला आमदारांची संख्या २८४ राहिली तर २६ चा कोटा राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सद्सदविवेकबुद्धीचे स्मरण करून अधिकृत उमेदवाराला मत मिळेल व विरोधकांनीही सद्सदविवेकबुद्धीचे स्मरण करत आम्हालाच मत द्यावे, असेही अजितदादा पवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत चमत्कार होईल की नाही आणि चमत्कार कसा घडेल, हे उभा महाराष्ट्र सोमवारी पाहील, असे अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.

‘अग्निपथ’वरून अनेक राज्यात तरुण रस्त्यावर उतरून जाळपोळ करत आहेत. ही योजना जाहीर करताना केंद्राने वयाचा निर्णय घेतला नव्हता. मात्र तरुणांचा संताप लक्षात घेता वयाच्या अटीमध्ये केंद्र सरकारने बदल केला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने अगोदरच घ्यायला हवा होता. म्हणजे हा रोष वाढला नसता, अशी प्रतिक्रिया अजितदादा पवार यांनी दिली. दरम्यान तरुणांनी राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करू नये. कोरोना काळात अनेक रोजगार गेले आहेत. त्यामुळे तरुणांच्या भावना आम्ही समजून आहोत, असेही ते म्हणाले.