राज्यात नवीन २३ संवर्धन राखीव, ५ अभयारण्ये ; पर्यावरणस्नेही विकासाचा आग्रह कायम – मुख्यमंत्री

मुंबई,१५ जून  /प्रतिनिधी :-  राज्यात मागील अडीच  वर्षात १७५०.६३ चौ.कि.मीचे २३ नवीन संवर्धन राखीव,  ६४७.१२९४  चौ.कि.मी ची  ५  नवीन अभयारण्ये आणि ८५.८९ हेक्टरच्या ४ जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती ही हरित  महाराष्ट्राची ध्येयवादी वाटचाल दर्शवित असून या माध्यमातून राज्याच्या संरक्षित वनाचे क्षेत्र वाढतांना वन्यजीवांचा भ्रमणमार्ग ही सुरक्षित होतांना दिसत आहे.  शासनाने नेहमीच पर्यावरणस्नेही विकासाला प्राधान्य दिले असून शाश्वत विकासाचा तो महत्वाचा आधार असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

नव्याने निर्माण करण्यात आलेल्या २३ संवर्धन राखीव क्षेत्रांपैकी ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाले असून उर्वरित संवर्धन राखीव क्षेत्रांची अधिसुचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही आहेत संवर्धन राखीव क्षेत्रं (क्षेत्र चौ.कि.मी)

राज्यात मागील अडीच वर्षाच्या काळात जी नवीन संवर्धन राखीव क्षेत्रं घोषित झाली आहेत त्यामध्ये   कोल्हापूर वनवृत्तातील तिलारी, जि. कोल्हापूर (२९.५३) जोर जांभळी-जि.सातारा (६५.११), आंबोली दोडामार्ग (५६.९२)- जि.सिंधुदूर्ग, विशाळगड- जि. कोल्हापूर (९२.९६), पन्हाळगड- जि. कोल्हापूर (७२.९०), मायणी पक्षी संवर्धन-.जि. सातारा,  (८.६७), चंदगड- जि. कोल्हापूर (२२५.२४), गगनबावडा- जि. कोल्हापूर (१०४.३९), आजरा भुदरगड – जि.कोल्हापूर (२३८.३३),मसाई पठार –जि. कोल्हापूर (५.३४),  नागपूर वनवृत्तातील मुनिया –  जि. नागपूर,  (९६.०१),  मोगरकसा- जि. नागपूर (१०३.९२), अमरावती वनवृत्तातील महेंद्री-जि. अमरावती  (६७.८२),  धुळे वनवृत्तात चिवटीबारी- जि. धुळे (६६.०४), अलालदरी- जि. धुळे (१००.५६), नाशिक वनवृत्तातील कळवण-जि. नाशिक (८४.१२), मुरागड-जि. नाशिक (४२.८७), त्र्यंबकेश्वर-जि. नाशिक (९६.९७), इगतपुरी-जि. नाशिक (८८.५०),  ठाणे वनवृत्तातील रायगड संवर्धन राखीव- जि. रायगड (४७.६२), रोहा संवर्धन राखीव- जि. रायगड (२७.३०), पुणे वनवृत्तातील भोर-जि. पुणे,  ( २८.४४), कोल्हापूर वनवृत्तातील दरे खुर्द (महादरे)- जि. सातारा (१.०७),  यांचा समावेश आहे. यातील तिलारी, जोर जांभळी, आंबोली दोडामार्ग, विशाळगड, पन्हाळगड,  मायणी, चंदगड, मुनिया आणि महेंद्री  ही ९ संवर्धन राखीव क्षेत्रं अधिसूचित झाली आहेत.

पाच अभयारण्ये  (क्षेत्र चौ.कि.मी)

शासनाने चंद्रपूर वनवृत्तात  कन्हारगाव- जि. चंद्रपूर (२६९.४० चौ.कि.मी), विस्तारीत अंधारी वन्यजीव अभयारण्य-जि. चंद्रपूर ( ७८.४०), धुळे वनवृत्तातील मुक्ताई भवानी- जि. जळगाव (१२२.७४०), गडचिरोली वनवृत्तातील कोलामार्का- जि. गडचिरोली ( १७५.७२),  बुलडाणा वनवृत्तातील विस्तारीत लोणार वन्यजीव अभयारण्य- जि. अमरावती (.८६९४) अशी पाच अभयारण्ये याच कालावधीत घोषित केली आहेत.  यातील कन्हारगाव अभयारण्याची अधिसुचना निघाली असून उर्वरित अभयारण्याची अधिसूचना निर्गमित करण्याची कार्यवाही सुरु आहे.

जैवविविधता वारसा स्थळे (क्षेत्र हेक्टर)

पुणे जिल्ह्यातील गणेशखिंड (३३.०१), जळगाव जिल्ह्यातील लांडोरखोरी (४८.०८),  सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बांबर्डे मायरेस्टिका (२.५९) आणि शिुस्टुरा हिरण्यकेशी ही चार जैवविविधता वारसा स्थळे मागील अडीच वर्षाच्या काळात घोषित करण्यात आली असून या सर्वांची अधिसुचना निर्गमित झाली आहे.

रामसर दर्जा

लोणार ला रामसर साईट दर्जा मिळाला असून ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याच्या रामसर दर्जाचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे.