आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या वाढवा; कोविड लसीकरणाला पुन्हा गती द्या

धोका वाढला! राज्यात शनिवारी १३५७ तर सर्वाधिक ८८९ कोरोना रूग्णांची नोंद मुंबईत

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांचे जिल्हाधिकारी, आयुक्त यांना पत्र

मुंबई,४ जून  /प्रतिनिधी :- कोविड बाधित रुग्णांची गेले काही दिवसांत वाढत असलेली संख्या पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची  संख्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत.

पुण्‍याचा निर्धार, कोविडवर प्रहार

डॉ. व्यास यांनी याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

डॉ. व्यास यांनी नमूद केले आहे की, राज्यातील चाचण्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.  एक जूनच्या माहितीनुसार राज्यातील सव्वीस जिल्ह्यातील चाचण्यांची संख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षाही कमी झाली आहे. ही बाब तात्काळ सुधारणा करणे आवश्यक आहे. प्रति दहा लाख लोकसंख्येमागे एका आठवड्यात किमान 980 चाचण्या करणे आवश्यक आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. एकूण चाचण्यांपैकी साठ टक्के चाचण्या आरटीपीसीआर असायला हव्यात. याबाबत दर आठवड्याला सर्व लॅबोरेटरी चालकांची बैठक घ्यावी. कोविड 19 पोर्टलवर माहिती भरली जावी. रॅपिड अँटीजेन टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी केली जावी. ज्या लॅबोरेटरी मध्ये अतिशय कमी अथवा एकदम जास्त रुग्ण आढळत असतील तर त्यावर नजर ठेवली जावी.

राज्याच्या काही भागात कोविड विषाणूचे विविध व्हेरियंट आढळले होते. या पार्श्वभूमीवर नवीन पॉझिटिव्ह केसेस बाबत दर आठवड्याला विश्लेषण केले जावे. या आधारे स्थानिक पातळीवर  उपाययोजना करणे शक्य होईल. नवीन रुग्ण आणि पुन्हा बाधित होणारे रुग्ण याबाबत विश्लेषण केले जावे, असे श्री. व्यास यांनी नमूद केले आहे.

नजीकच्या काळात कोविड रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता गृहित धरून रुग्णालयातील पायाभूत सुविधा, कोविडसाठी तयार करण्यात आलेल्या सुविधा व्यवस्थित आहेत का याची पाहणी करावी. मनुष्यबळ, वाहतूक व्यवस्था, यंत्रसामग्री आदी सुस्थितीत आहेत याची खात्री करावी, असेही डॉ. व्यास यांनी पत्रात नमूद केले आहे.

ताप आणि सारीने आजारी असणारे रुग्णांवर लक्ष ठेवून राहावे. ताप अथवा घशात खवखव असणाऱ्या नागरिकांना चाचणी करुन घेण्यास सांगावे. सहव्याधी असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना एसएमएसचा( सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि सॅनिटायझेशन) वापर करण्यास सांगावे. कोविड अनुकूल वर्तन करण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात यावे. ट्रेन, बस, चित्रपटगृह, कार्यालय, महाविद्यालय, दवाखाना आणि शाळांत मास्क वापरण्यास प्रवृत्त करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. त्याचबरोबर लसीकरण आणि संरक्षक लसीचा डोस घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

राज्यात शनिवारी १३५७ कोरोना रूग्णांची नोंद

राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असून शनिवारी राज्यात १३५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे मुंबई शहरातील असून मुंबईत आज ८८९ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज कोरोनामुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे.

राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्यादेखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज एकूण ५८८८ सक्रिय रुग्ण आढळले असून मुंबईत सर्वाधिक म्हणजे ४२९४ इतक्या सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्या खालेखाल ठाण्याचा क्रमांक लागत असून ठाण्यामध्ये ७६९ इतके सक्रिय रुग्ण आहेत. २८ मे रोजी बीए ४ आणि बीए ५ ओमायक्रॉन सब व्हेरीयंट रुग्णांची नोंद झाल्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. २७ मे रोजी राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या २ हजार ७७२ होती. तर आज ४ जून रोजी ॲक्टिव्ह रुग्णसंख्या ५ हजार ८८८ वर गेली आहे.

राज्यात आज एकूण ५९५ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत एकूण 77,37,950 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.05 टक्के आहे. राज्यात आज केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 78,89,212 झाली आहे.