वैजापूर तालुक्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार – डॉ.नीलमताई गोऱ्हे

गंगापूर तालुक्याच्या विकासकामांचाही घेतला आढावा

वैजापूर ,४ जून  /प्रतिनिधी :- संयुक्त राष्ट्र संघाच्या शाश्वत विकासाच्या उद्दिष्टानुसार विकासाला चालना देण्याचे कार्य शासन करत आहे. त्या विकास ध्येयाच्या पूर्तीसाठी  अधिकारी- कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामुळे वैजापूर तालुक्याच्या विकासाला अधिक चालना मिळणार असल्याचे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे म्हणाल्या.

वैजापूर पंचायत समिती कार्यालयाच्या   सभागृहात तालुक्यातील विकास कामांचा आढावा डॉ.गोऱ्हे यांनी घेतला, यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार रमेश बोरनारे, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार राहुल गायकवाड, साबेर भाई, सचिन वाणी आदींसह वैजापूरचे सर्व नगरसेवक, महिला पदाधिकारी आदींची उपस्थिती होती.

उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी नैसर्गिक आपत्ती संदर्भात उपाय योजना, मॉन्सून पूर्व तयारी, अन्नधान्य पुरवठा, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत, रोजगार हमी योजना, तालुक्याला आवश्यक निधी, महिला दक्षता समिती आदींचा सविस्तर आढावा घेतला. सामान्यांचा विकास हेच शासनाचे ध्येय आहे. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील सरकार अतिशय चांगले काम करत आहे. सामान्यांच्या विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचनाही डॉ.गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना केल्या. त्याचबरोबर आमदार बोरनारे यांनी मागणी केल्याप्रमाणे सिंचन उपसा योजनेसाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

आमदार बोरनारे यांनी तालुक्यात महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 155 कोटी रुपयांचे पीक कर्ज माफ झाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत (पोकरा) राज्यात वैजापूर तालुका अव्वल असल्याचे सांगितले. तसेच या योजनेंतर्गत लाभ न मिळालेल्या गावांचा अंतर्भाव करावा, तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या ड यादीचे सर्वेक्षण करावे आदी विविध मागण्याही त्यांनी केल्या.तालुक्यातील सर्व माहिती उपविभागीय अधिकारी  आहेर, तहसीलदार गायकवाड यांनी सादर केली.

गंगापूर तालुक्याचाही घेतला आढावा

कोविडने पती गमावलेल्या विधवा महिलांना बी-बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शेतकरी प्रशिक्षण कार्यशाळा कृषी विभागाने आयोजित कराव्यात. सानुग्रह अनुदान, माविम, महामंडळाच्या कर्ज योजनांचा महिलांना लाभ मिळवून द्यावा. त्याचबरोबर कोविडमुळे जीव गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून द्यावा. आपत्ती व्यवस्थापनासाठी मास कम्युनिकेशन पद्धतीचा अवलंब करावा, असे निर्देश संबंधित अधिकारी यांना डॉ.नीलमताई गोऱ्हे यांनी दिले.

गंगापूर तहसील कार्यालयात विविध योजनांचा आढावा त्यांनी घेतला, यावेळी त्या बोलत होत्या. कोविड कालावधीत पालक गमावलेले पाल्य, कोविड काळातील प्रशासनाचे नियोजन, सद्यस्थितीत करत असलेल्या उपाययोजना, मॉन्सून पूर्व तयारी, मुख्यमंत्री पाणंद रस्ते, कोविड लसीकरण, पाणी पुरवठा, कृषी आदींसह विभागाच्या विविध योजना आणि कामांचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.

यावेळी आमदार बोरनारे, उपविभागीय अधिकारी आहेर, तहसीलदार सतीश सोनी, लता पगारे, श्रीमती पोळ, संतोष काळवणे, गंगापूरचे नगरसेवक आबासाहेब शिरसाट, भागेश गंगवाल, अविनाश पाटील, प्रकाश जयस्वाल, विविध विभागाचे अधिकारी आदींची यावेळी उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी आहेर यांनी उभारी 2.0 बाबतही सविस्तर माहिती सादर केली.