विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम घेतल्यास देशाचे भविष्य उज्वल -राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी

नांदेड ,१ जून /प्रतिनिधी :-देश उत्तोरोत्तर प्रगती करीत आहे. हाच वारसा पुढे नेण्यासाठी चांगली पिढी घडविणे तेचवढेच महत्वाचे आहे. युवकांनो तुमची तुमच्या कौशल्याची या देशाच्या विकासामध्ये गरज आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परिश्रम घेतल्यास या देशाचे भविष्य निश्चीतच उज्वल होणार आहे. असे मत राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. 

Image

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा चोविसावा दीक्षान्त समारंभ थाटात संपन्न झाला. या समारंभात अध्यक्षीय भाषणात कुलपती महोदय अभासी पद्धतीने बोलत होते. यावेळी ऑनलाईन प्रणालीद्वारे अध्यक्ष म्हणून राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती श्री. भगत सिंह कोश्यारी हे तर प्रमुख अतिथी म्हणून व महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  श्री उदयजी सामंत अभासी पद्धतीने उपस्थित होते. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून दीक्षान्तमंच्यावर नवी दिल्ली येथील वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर सी. मांडे उपस्थित होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल.एम. वाघमारे, आंतर-विद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. वैजयंता पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन शास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वसंत भोसले, मानवविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.अजय टेंगसे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य परमेश्वर हसबे, डॉ. दिपक बच्चेवार, डॉ. अशोक टिपरसे, डॉ. उमाकांत घाडगे, गोविंद घार, गजानन आसोलेकर, डॉ. महेश मगर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. 

या दीक्षान्त समारंभामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखाचे विद्यार्थी सायली त्रिकुटकर, हृषिकेश बागडी, एैशवर्या चिखले, कुबेर आलेटी यांना सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. मानव्य विद्याशाखेतून सलेहा सय्यद, प्रतिभा ढगे, रवि खिल्लारे, शितल सलगरे, प्रीती लामतुरे, प्रियंका गोरे, शितल रणवीर, अश्विनी कुलकर्णी, शबाना शेख, एैशवर्या माने, पूजा चव्हाण, बलदीपकौर खालसा, नितेश पाटील, विकास जाधव, रेणुका माल्कापुरे यांना सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आले. आंतरविद्याशाखीय अभ्यास शाखेमधील राहुल चव्हाण, राहुल बालुरे, अर्चना चौधरी या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमधील श्रुती उत्तरवार, तली सुलताना पटेल, कामरान मोहम्मद, भक्ती लांडगे, फातेमा शेख तमशिल, सचिन कळसे, प्रिया महेंद्रकर, ओम गिरी, राधिका कराड, गार्गी तम्मडवार, श्रद्धा काकडे, सुप्रिया गायकवाड, अश्विनी शिरसे, अभिजित देशमुख, सदाशिव वाडेपल्ली, विशाल खंडोमालके, काव्या मेहता या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले आहे. असे एकूण ५२ सुवर्णपदक मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत.   

पुढे कुलपती म्हणाले की, भेदभावाच्या भावनेला थारा देऊ नका सर्वांना सोबत घेऊन जीवन समृद्ध करण्यासाठी सदैव तत्पर रहा. चांगला माणूस बनणे हेच आपले ध्येय बाळगा. आपल्या भाषणात त्यांनी विद्यापीठाने जलसंधारणाबाबत केलेल्या कामाचे कौतुक केले. ते म्हणाले की, मराठवाड्यासारखा मागास भागात हे काम प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी हा वारसा पुढे चालवावा. 

Image

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  उदय सामंत यांनी विद्यापीठाने कोव्हीड-१९ काळात लॅबद्वारे केलेल्या कामाचे कौतुक केले. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्राचा टक्का वाढला आहे. याबद्दल समाधान व्यक्त करून सुवर्ण पदक विजेत्या विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. 

वंश, भाषा, लिंग, प्रदेश वा आर्थिक दर्जा असे भेद व्यर्थ आहेत.सामाजिक समता हेच श्रेष्ठ मूल्य आहे. हे विवेक सत्य विज्ञानाने शिकविले आहे.निसर्ग आणि यांचा संघर्ष संपवून विश्व समृद्ध करण्याची जबाबदारी तरुणांनी स्वीकारावी, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ तथा वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाचे माजी सचिव डॉ. शेखर सी.मांडे यांनी केले. 

पुढे ते म्हणाले,१९४० ते १९६०या काळात अनेक देश स्वतंत्र झाले पण या सर्वांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताने केलेली प्रगती अनन्यसाधारण आहे. माहिती म्हणजे ज्ञान नव्हे, असामान्य शिक्षक माहितीचे रुपांतर ज्ञानात करतो असे सांगतानाच श्रमाशिवाय धन, विवेकाविना आनंद, ज्ञानाविना चरित्र, नीतीविना व्यापार, मानवते विना विज्ञान, त्यागाविना धर्म, तत्वाशिवाय राजकारण ही महात्मा गांधींनी सांगितलेले सात वाक्य आहेत. याचे सदैव स्मरण ठेवा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल सादर केला. विद्यापीठाने सहा नवे पेटंट मिळविले आहेत. संशोधन क्षेत्रातही विद्यापीठाने चमकदार कामगिरी केली आहे. विविध आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आणि संस्थांशी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. विद्यापीठाकडे जरी साधनसामग्री कमी असली तरी जिद्द मोठी आहे. 

या समारंभाच्या दुसऱ्या सत्रामध्ये पी.एचडी पूर्ण केलेल्या जवळपास २०० विद्यार्थ्यांना पदवीचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेमधून ३१ विद्यार्थी होते. मानव्य विज्ञान विद्याशाखेमधून ८३ विद्यार्थी होते. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेमधून ९७ विद्यार्थी होते. आंतरविद्याशाखेमधून २७ विद्यार्थी होते. यामधील ३८ विद्यार्थ्यांनी पोष्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र मागविले होते. तर उर्वरित विद्यार्थ्यांनी या समारंभामध्ये उपस्थित राहून मान्यवरांच्या हस्ते पी.एचडी पदवी प्रमाणपत्र स्विकारले. 

दीक्षान्त समारंभामध्ये सर्वप्रथम दीक्षान्त मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून  विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली तर दीक्षांत समारंभाची सांगता राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.पृथ्वीराज तौर आणि डॉ. योगिनी सातारकर यांनी केले. यावेळी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरीषद यासह विविध प्राधिकरणावरील सदस्य, विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य, संचालक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह पालकांची उपस्थिती होती. यावेळी सुवर्ण परितोषिक विजेत्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते गौरव करण्यात आला.