धारधार कृपानने भरदिवसा गळा चिरून विद्यार्थिनीची हत्या:शरणसिंग सेठीच्या पोलिस कोठडीत वाढ
औरंगाबाद ,२७ मे /प्रतिनिधी :- देवगिरी महाविद्यालयात शिकणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला एकतर्फी प्रेमातून धारधार कृपानने भरदिवसा गळा चिरून हत्या केल्याप्रकरणी आरोपी शरणसिंग सविंदरसिंग सेठी (२०, रा. भिमपुरा) याच्या पोलिस कोठडीत २ जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एस.डी. कुर्हेकर यांनी शुक्रवारी दि.२७ यांनी दिले.
एकतर्फी प्रेमातून शरणसिंग सेठी या युवकाने २१ मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास, मयत कशीश हिच्या सोबत रचनाकार कॉलनी भागातील कॅफे इमोजी येथे कॉफी घेतली. कॉफी घेतल्यानंतर शरणसिंग हा कॅफेचा बाहेर आला. कॅफेहून कशीशला बोलण्यासाठी दोनशे फुट अंतरावर घेऊन गेला. त्या ठिकाणी एका खुल्या प्लॉटवर कशीश हिचा धारदार हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आली. घटनास्थळी मदतीसाठी कशीशच्या मैत्रिणीवरही त्याला हल्ला केला होता. मयत सुखप्रीत कौर ऊर्फ कशीश (१८) हिचा भाऊ हरप्रित सिंग प्रितपाल सिंग ग्रंथी (२४) याने दिलेल्या फिर्यादीवरुन वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करुन शरणसिंग सेठी याला नाशिक येथील लासलगाव येथून अटक केली. तर न्यायालयाने त्याला आजपर्यंत कोठडी सुनावली होती.पोलिस कोठडी दरम्यान आरोपीचे रक्ताने माखलेले कपडे आणि धारदार हत्यार पोलिसांनी जप्त केले. तत्पूर्वी खुनाच्या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस आयुक्तांनी तपास विशेष पथकाकडे वर्ग केला आहे.
त्यानूसार विशेष पथकाने आरोपीला ताब्यात घेतले, आरोपीच्या कोठडीची मदुत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील दत्तात्रय काठुळे यांनी आरोपीने गुन्ह्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले आहे, आरोपीने कट कोठे व कोणासोबत रचला होता, गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्याने कोठून आणले, गुन्हात आरोपीचा एक मित्र सोबत असल्याचे समोर आले आहे, त्याचा गुन्ह्यात काय सहभाग आहे याचा तपास बाकी आहे. आरोपीला पसार होण्यात कोणी मदत केली होती काय याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.