औषधांचा काळाबाजार रोखण्यासाठी कारवाई वाढविणार – अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
मुंबई, दि. २५ : कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब या औषधाचा पुरवठा मर्यादित असल्याने काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक या औषधांचा काळाबाजार करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून अन्न व औषध प्रशासनामार्फत संपुर्ण राज्यभरात कारवाया वाढविण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी विभागाला दिले आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आता पर्यंत मुंबई व ठाणे येथे चार प्रकरणात कारवाई केली आहे, असे सांगुन डॉ. शिंगणे यांनी पुणे, नाशिक, औरंगाबाद येथुन येत असलेल्या तक्रारींकडे लक्ष वेधले आहे. औषधांच्या काळाबाजाराला रोखण्यासाठी राज्यभर कारवाया होणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून पोलिस गुप्तचर यंत्रणा व पोलिस प्रशासना मार्फत प्राधान्याने कारवाया करण्याच्या सूचना देण्यात याव्यात, अशी विनंती डॉ. शिंगणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका पत्राद्वारे केली आहे.
रेमडेसिवर आणि टोसिलीझुमॅब औषधांच्या वापराबाबत मार्गदर्शन आवश्यक
कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे प्रामुख्याने रेमडेसीवर [Remdesivir 100 mg Inj] व टोसीलीझुमॅब (Tocilizumab Inj) या औषधाच्या वापराबद्दल संभ्रम निर्माण होत असून या औषधांच्या वापराबाबत कोविड टास्कफोर्सच्या माध्यमातून निश्चित असे मार्गदर्शन होणे आवश्यक आहे, असे मत, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केले आहे. या आशयाची मागणी करणारे पत्र त्यांनी नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहीले आहे.
आपल्या पत्रात डॉ. शिंगणे यांनी लिहीलेआहे, कोरोना आजाराच्या उपचारासाठी लागणारे रेमडेसीवर आणि टोसीलीझुमॅब या औषधांच्या वापराबद्दल सध्या संभ्रम आहे.या औषधाची मागणी जास्त आणि पुरवठा मर्यादित असल्याने तुटवडा भासत आहे रुग्णालयांकडुन दाखल असलेल्या रुग्णांसाठी या दोन्ही औषधांची मागणी केली जाते आहे.काही ठिकाणीही औषधे जास्तप्रमाणात प्रिस्क्राईब केले जात असल्याची बाब निदर्शनास आली आहे,कोविड रिपोर्ट येण्यापुर्वी किंवा रिपोर्ट आल्यानंतर पहिल्या दिवशीच ही औषधे प्रिस्क्राईब केलेली किंवा एकाच प्रिस्क्रीपशन वर दोन्ही औषधे मागवलेली असल्याची माहिती मिळाली आहे.
कमी पुरवठ्यामुळे औषध रुग्णाला वेळेवर मिळणार नाही या भीतीपोटी अगोदरच औषधाची मागणी केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबतची जनतेच्या मनातील भीती व संभ्रम दूर करण्यासाठी राज्यस्तरावर नेमण्यात आलेल्या कोविड टास्क फोर्समार्फत रेमडेसीवर व टोसीलीझुमॅब ही औषधे रुग्णाचा कोविड पॉजीटीव रिपोर्ट आल्या नंतर कोणत्या दिवशी व कोणत्या परिस्थितीत द्यावीत,तसेचही दोन्ही औषधे एकाच वेळी रुग्णांना देता येतात का?याबाबत राज्यातील जनतेला मार्गदर्शन व्हावे यासाठी कोविड टास्क फोर्सला उचित निर्देश देण्याची विनंती डॉ. शिंगणे यांनी आरोग्यमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.