स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमात महाराष्ट्र अव्वल – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई,२५ मे /प्रतिनिधी :- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे मूल्यांकन व संनियंत्रण केंद्र शासनाच्या वतीने केले जाते. यात महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा देशातील प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येकाच्या मनाचा  उत्सव आहे. त्यामुळे त्याचा महोत्सव पुढेही सुरू ठेवून महाराष्ट्राचे प्रथम क्रमांकाचे स्थान पुढेही टिकून राहिल, असा विश्वास ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी  व्यक्त करून सर्व अधिकारी, कर्मचारी व लाभार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध पातळीवर उपक्रम घेण्यासंदर्भातील नियोजन केले होते. त्यामध्ये ग्राम विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या उमेद अभियान, ग्रामीण गृहनिर्माण विभाग, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान, दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन मिशन, पंचायत विस्तार (अनुसूचित क्षेत्र) कायदा (पेसा), ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान, प्रशिक्षण संस्था, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत अशा विविध स्तरावरील यंत्रणांद्वारे कार्यक्रमांचे नियोजन करून त्याची अंमलबजावणी सप्टेंबर 2021 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत येणाऱ्या दिनविशेष, सप्ताह, पंधरवडा इ. मध्ये करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास‍ व पंचायतराज विभागाने भारत सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या https://indiaat75.nic.in या संकेतस्थळावर 2 लाख 49  हजार 123 कार्यक्रमांचे आयोजन करून देशात प्रथम क्रमांकावर येण्याचा मान मिळविला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा राज्याच्या ग्राम विकास व पंचायतराज विभागाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात ४१  हजार ४४० कार्यक्रमांसह दुसऱ्या तर २८ हजार ९०३ कार्यक्रमांसह झारखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या उपक्रमात ग्रामपंचायत स्तरावर २ लाख ४१ हजार ४७१, पंचायत समिती ५२०९  तर जिल्हा परिषदांचे २४४३ असे एकूण २ लाख ४९ हजार १२३ कार्यक्रम छायाचित्रासह भारत सरकारच्या संकेतस्थळावर अपलोड झाले आहेत. त्यात राज्यातील अहमदनगर, पुणे, लातूर हे जिल्हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. एकूण २७ हजार ८९८ ग्रामपंचायतींपैकी २६ हजार २०० ग्रामपंचायतींची माहिती या पोर्टलवर अपलोड झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीची माहिती अपलोड करण्याचे काम सुरू आहे.

या कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत स्तरावर नोडल अधिकारी नियुक्त केले आहे. राज्यात २७ हजार ८९८ ग्रामपंचायतींपैकी २७ हजार ८९२  ग्रामपंचायतींमध्ये नोडल अधिकारी नियुक्त केले असून, ५०६७  समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यातही महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ उत्तराखंड २०२० समित्यांसह दुसऱ्या स्थानावर तर १९१६ समित्यांच्या स्थापनेसह राजस्थान तिसऱ्या स्थानावर आहे.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार यांचे मार्गदर्शनाखाली राज्यस्तरावरुन राज्य नोडल अधिकारी डॉ. राजाराम दिघे, संचालक-ग्रामीण गृहनिर्माण हे काम पाहत असून त्यांचे समवेत ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे कार्यक्रम व्यवस्थापक अनंता मुदगले, ग्रामीण गृहनिर्माण कक्षातील संघरत्न सोनोणे व संघपाल चव्हाण हे काम पाहत आहेत.

जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून काम पाहत असून त्यांचे समवेत सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे (VSTF) जिल्हा कार्यकारी हे सहाय्य करीत आहे.