राजभवन येथे अटल पुरस्कार २०२२ प्रदान

मुंबई, दि. 23 : भारतात विविध प्रांतांमध्ये भाषा व वेशभूषा जरी वेगवेगळ्या असल्या तरीही सर्व लोक एका संस्कृतीच्या धाग्याने बांधले आहेत. शिक्षण, क्रीडा व संस्कृतीच्या माध्यमातून राष्ट्रीयतेचे बंध अधिक मजबूत होतात त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी शिक्षण, क्रीडा व संस्कृती हे उत्तम धोरण आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते आज क्रीडा, कला, वैद्यकीय सेवा, समाजसेवा यांसह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या युवक युवतींना राजभवन मुंबई येथे अटल पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

दिवंगत पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अटल भारत क्रीडा व कला संघ या संस्थेतर्फे हे पुरस्कार देण्यात आले.

स्व. अटल बिहारी वाजपेयी हे अजातशत्रू व्यक्तिमत्व होते. विनम्र व हसतमुख असलेल्या वाजपेयी यांचा विरोधी पक्षातील लोक देखील आदर करीत असल्याचे राज्यपालांनी आपल्या भाषणात सांगितले. वाजपेयी त्यांच्या बालपणात खेळाडू नसले तरीही ते त्यांच्या खिलाडूवृत्तीसाठी प्रसिद्ध होते, असेही राज्यपालांनी सांगितले.

कार्यक्रमाला अभिनेते मुकेश आर के चोकसे, अटल भारत क्रीडा व कला संघाचे कार्याध्यक्ष डॉ दिनेश सबनीस, संस्थापक दिलीप चंद यादव यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी मिताली वागळे, प्रदीप कुमार, पुजाश्री जावेर, साना खान, प्रदीप कुमार यादव, खुशबु जैन, संजय सोनालकर, एम ए मुर्तझा, रुही जैन, विजय माधेकर, विजय कुमार, केदार विजय साळुंखे, कानाझ सयैद, शालिनी संचेती, अभिषेक जाधव, दिपाली एम के, बालकृष्णा चिटणीस, रामया नायर, स्म‍िता काटवे, डॉ प्राची केदार शिंदे, प्रदीप देशमुख यांना राज्यपालांच्या हस्ते अटल पुरस्कार  प्रदान करण्यात आले.