चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तब्बल 363 कोटी रुपये खर्च करणार- माहिती व प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर


केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्र्याची पुण्यातील एफटीआयआय, एनएफएआयला भेट; एफटीआयआयला आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यासाठीच्या उपाययोजनांवर केली चर्चा

मुंबई/पुणे,५ मे  /प्रतिनिधी :-भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संरक्षण आणि प्रसार यांना प्राधान्य दिले पाहिजे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आहे आणि चित्रपट हे या वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत, असे प्रतिपादन माहिती आणि प्रसारणमंत्री श्री. अनुराग सिंह ठाकूर यांनी आज पुण्यामधील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिलेल्या भेटी दरम्यान केले. आपल्या चित्रपटसृष्टीच्या वारशाचे जतन, पुनरुज्जीवन आणि डिजिटायजेशन करणे हा 2016 मध्ये सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाचा उद्देश आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी घोषणा केली की, या मिशनच्या एकूण 597 कोटी रुपये तरतुदीपैकी 363 कोटी रुपये निव्वळ पुनरुज्जीवनावर खर्च करण्यात येतील, असा निर्णय काल घेण्यात आला आहे, ज्यामुळे हा प्रकल्प जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पांपैकी एक असेल. चित्रपट हे आपल्या संस्कृतीचा भाग आहेत आणि गेल्या 100 वर्षात चित्रपट उद्योगाने दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे भारत जगातील सर्वात मोठा चित्रपट उद्योग बनला आहे.

Image

या अभियानांतर्गत 5900 हून अधिक लघुपट, माहितीपट आणि फीचर्स यांचे जतन आणि त्यांना मूळ स्वरूपात राखण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि एनएफएआय द्वारे सुरू असलेली ही प्रक्रिया जगातील सर्वात मोठ्या जीर्णोद्धार, संवर्धन, जतन आणि डिजिटलायझेशन प्रक्रियेपैकी एक आहे अशी त्यांनी माहिती दिली.

पुनरुज्जीवन प्रक्रियेमध्ये लघुपट, फीचर्स, विविध भारतीय भाषांमध्ये बनवलेले माहितीपट यासह अनेक चित्रपटांचा समावेश असल्याची माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की सरकारने ही जबाबदारी एका मिशन मोडमध्ये घेतली आहे आणि आगामी पिढ्यांसाठी हा मौल्यवान चित्रपट वारसा , पुनरुज्जीवीत आणि संग्रहित करण्याकरिता नवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

याआधी अनुराग सिंह ठाकूर यांनी फिल्म एन्ड टेलिव्हिजन इंस्टीट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) च्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. एफटीआयआय, सर्वोत्कृष्टतेत  आंतरराष्ट्रीय तोडीचे करण्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी यावेळी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रपट संस्थासमवेत सहयोग केल्याने विद्यार्थ्यांची कथा सांगण्याची क्षमता वृद्धिगत होईल असे त्यांनी सांगितले. एफटीआयआयने उद्योजकता कौशल्याची जोपासना करत चित्रपट आणि दूरचित्रवाणी   क्षेत्रात स्टार्ट अप्स साठी विद्यार्थ्यांना सज्ज करावे असेही त्यांनी सुचवले. एफटीआयआय ही भारतातली  प्रतिष्टीत  संस्था आहे.  दूरचित्रवाणी आणि चित्रपट क्षेत्रात एफटीआयआयला आणखी पुढे कसे नेता येईल यावर तसेच अनिमेशन, गेमिंग, आणि कॉमिक्स मध्ये एफटीआयआयला कसे प्रोत्साहन देण्याबाबतही या  आढावा बैठकीत तपशीलवार चर्चा झाली. आपल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला आकार देत त्यांना रोजगार मिळवणारे ऐवजी त्यांना उद्योजक म्हणून घडवता येईल असेही त्यांनी सांगितले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात आमचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आमच्या संस्था आणि विद्यार्थी केंद्रस्थानी असल्याचे त्यांनी एक दिवसांच्या आपल्या पुणे भेटीत सांगितले. भारत जगाचा कन्टेन्ट अर्थात आशय विषयक केंद्र ठरावा यासाठी आपला दृष्टीकोन बदलण्याच्या उद्देशाने  हा आढावा घेतला जात  असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी आज एफटीआयआय आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय एनएफएआय इथे आढावा बैठक घेतली.”या संस्थेचे  जे सर्वोत्कृष्ट  आहे ते प्रदर्शित  करण्यासाठी आणि नव्या  काळातील चित्रपटविषयक  उत्कृष्टता, भागीदारी आणि अन्य अनेक  गोष्टींच्या सज्जतेसाठी  आपण एकत्रितपणे  कशाप्रकारे  काम करू शकतो हे समजून घेण्याच्या अनुषंगाने,  मी एफटीआयआयच्या  विद्यार्थ्यांशी आणि प्राध्यापकांशी संवाद साधला”,असे मंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी एफटीआयआयचे शैक्षणिक नियतकालिक “लेन्ससाइट” च्या हिंदी आवृत्तीचेही प्रकाशन केले.

विभाग प्रमुखांशी संवाद साधताना, मंत्र्यांनी  प्राध्यापकांना स्वतःला अपग्रेड करत राहण्याचे आणि उद्योग क्षेत्रातून  एफटीआयआय मध्ये भागीदार आणण्याचे आवाहन केले. देशाच्या विविध भागात चित्रपट आणि दूरचित्रवाणी निर्मितीचे अभ्यासक्रम चालवण्यासाठी संस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात त्या भागात पोहोचण्याच्या उपक्रमांवर आणि भागीदारीवरही त्यांनी भर दिला.एफटीआयआयचे अध्यक्ष शेखर कपूर; माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा; एफटीआयआयचे संचालक संदीप शहारे आणि  संस्थेचे इतर अधिकारीही यावेळी उपस्थित होते