विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत महाराष्ट्र राज्य देशात अग्रेसर- पालकमंत्री धनंजय मुंडे
परभणी,१ मे /प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासूनच राज्याने शिक्षण, आरोग्य, सहकार, कृषी अशा विविध क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती केली असल्याने आज आपले राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जात असल्याचे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.
येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रिडा संकुलावर महाराष्ट्र राज्याच्या 62 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात श्री. मुंडे हे बोलत होते. . यावेळी खासदार संजय जाधव, डॉ. फौजिया खान सर्वश्री आमदार डॉ. राहूल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, पोलिस अधिक्षक जयंत मीना, मनपा आयुक्त देविदास पवार अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री. मुंडे म्हणाले की, प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणारा आपला परभणी जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात प्रगती करीत आहे. ही आनंदाची बाब असून, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरीता आपण सर्वजण कटीबध्द आहोत. तसेच देशात स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येत असून, या पार्श्वभूमीवर आपल्या जिल्ह्यात देखील विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहे. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यात शेतीबरोबरच पायाभूत सुविधांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महासंकटाचा प्रभाव सुरु आहे. राज्यावर अशा एका मागोमाग एक महासंकटे सुरु असतांनाही राज्य शासन अशा संकटावर यशस्वीपणे मात करत आहे. मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या महासंकटाचा परभणी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांनी पहिल्या, दूसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत योग्य नियोजन करत आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत या महासंकटाचा यशस्वी मुकाबला केला. याकरिता परभणी जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणांचे मी अभिनंदन करतो.