महाराष्ट्रात पुन्हा मास्कची सक्ती:आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे संकेत

मुंबई,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- महाराष्ट्रात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा एकदा मास्क सक्ती होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. तसेच याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करणार असून, या बैठकीनंतर या संदर्भातील निर्णय होऊ शकतो, असेही ते म्हणाले.

बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या अनुषंगाने ही माहिती टोपे यांनी दिली.

“आज मुख्यमंत्री सायंकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यामुळे त्या मिटींगच्या अनुषंगाने कदाचित गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्क अनिवार्य होऊ शकतात. असा या बैठकीनंतर निर्णय होऊ शकतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क घालायला हवेत. त्या दृष्टीने एक साधारण चर्चा झाली आहे.” असे आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितले.

माध्यमांना बैठकी संदर्भात माहिती देताना राजेश टोपे म्हणाले की, “प्रामुख्याने पंचसूत्री जी आहे त्यानुसार कार्यवाही आपण करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने पहिले सूत्र म्हणजे तपासण्या, तर आपण २५ हजारांपर्यंत दररोज तपासण्या करत आहोत. ही २५ हजारांची तपासणी आम्ही निश्चितपणे वाढवू. कारण, किरकोळ स्वरूपात महाराष्ट्र पाहिले तर खूप सुरक्षित झोनमध्ये आहे. चिंता करण्याची परिस्थिती नाही. महाराष्ट्राने एका एका दिवशी ६५ ते ७० हजार केसेस बघितलेल्या आहेत. त्यामुळे एकंदर पर मिलियनमध्ये आपण खूप खाली आहोत. असे ते म्हणाले.

तसेच, “काळजी घ्या आणि कार्यवाही करा, या संदर्भात ज्या काही बाबी सांगितलेल्या आहेत, त्यामध्ये टेस्टिंग आम्ही नक्कीच वाढवू, ट्रॅकिंग करू आणि गरजेप्रमाणे निश्चित उपचार करू. जिनोमिक सिक्वेन्सिंग करायला सांगितलं आहे, ते देखील आम्ही करू.” अशी देखील माहिती आरोग्यमंत्री टोपेंनी दिली.

याचबरोबर, “सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे लसीकरणाचा, त्यामध्ये देखील आपण वाढ करणार आहोत. हे आजच्या बैठकीत ठरवण्यात आलेले आहे. त्यामध्ये सहा ते १२ वयोगटासाठी लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिलेली आहे. त्यामुळे आता हे महाराष्ट्रासमोर पुन्हा एक मोठे काम, निश्चितप्रकारे आहे. त्या संदर्भातील विस्तृत नियमावली अद्याप पाठवलेली नाही. जसे ते येतील त्याची अंमलबजावणी राज्याच्या आरोग्य विभागाकडून केली जाईल. शाळा आणि विद्यार्थ्यांच्या पालकांना विश्वासात घेऊन लसीकरण वाढवावंच लागणार.” असेही राजेश टोपे यांनी सांगितले.