इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी एकत्रित काम करणे काळाची गरज – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

नवी दिल्ली,२७ एप्रिल  /प्रतिनिधी :- इंडो-पॅसिफिक भूभागातील राष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे मांडले.

ऑबजर्वर रिसर्च फॉऊंडेशन आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित  ‘रायसीना डायलॉग 2022’ च्या परिचर्चा कार्यक्रमात ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मानवी विकास पुनर्स्थापित करणे’ या विषयावर विचार मांडताना श्री.आदित्य ठाकरे बोलत होते. या परिसंवादात  एफडी, फ्रांसचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कार्यकारी संचालक फिलीपे ऑरलीयांग, स्पेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालक जेवीयर सॅलीडो ऑरटीज. युनायटेड किंगडमच्या कॉमन वेल्थ डेव्लपमेंट कार्यालयाचे संचालक मेलींडा बोहोन्नोन,  केनियातील युराय्या ट्रस्टचे कार्यकारी संचालक ऊडूअक अमिमो हे उपस्थित होते. या परिसवांदाचे समन्वयन ऑस्ट्रेलिया आणि न्युजींलँडच्या संचार व्यवस्थापक  रायली बॅजर्नी यांनी केले.

मंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, एकूणच इंडो-पॅसिफिक भूभागाकडे पाहताना त्यांच्यात सांस्कृतिक साम्य अथवा विरोधाभास दिसतो. तथापि, जागतिक पातळीवरील समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये कुपोषण, मुख स्वास्थ्य, अस्वच्छता, सध्या त्यात महामारीच्या आधीचे आणि नंतरचे बदल असे प्रश्न सर्वांना कमी अधिक प्रमाणात सारखेच  भेडसावत आहेत. मात्र, शाश्वत विकासाच्या दिशेन वाटचाल करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन सिमेंट यामध्ये होणा-या गुंतवणूकीबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विकास महत्वाचाच आहे. विकास होत असताना तो  लघु अथवा दिर्घकाळाचा  होत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे  चिंतन गरजेचे असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. शाश्वत विकास करायचा असल्यास आज, उद्याचा विचार करून चालणार नाही तर, येणा-या पिढ्यांसाठी हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या समोर असणारी वाढती लोकसंख्या, बदलते पर्यावरण, सामाजिक, राजकीय बदल अशा समस्या आहेत. यासाठी ऊर्जा सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आरोग्याची काळजी वर्तमानात या बाबी फार महत्वाच्या असल्याचे मत श्री ठाकरे यांनी यावेळी मांडले. या समस्या सोडविण्यासाठी विविध वैश्विक मंचांवर चर्चा होणे गरजेची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. राज्य म्हणून काही योजनांची अंमलबजावणी करता येऊ शकते, परंतु देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनुमते निर्णय होणे देशाच्या आणि राज्याचा विकासाला पुढे घेऊन जाणारे ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील महानगरांचा विकास सुरु

राज्यातील महानगरांच्या विकासात सार्वजनिक खाजगी भागीदारी महत्वाची असून या माध्यामातून या शहरांचा विकास होत असल्याचे मंत्री श्री ठाकरे यांनी या परिसंवादात सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, औंरगाबाद ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये लोकसहभागिता महत्वाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचे लक्ष या शहराकडे असून राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी धोरण बनविण्याची आणि ती राबविण्याची आहे. यासह येथे आर्थिक गुंतवणूक होत असताना येथील सुव्यवस्था राखणे, या शहराचे सौदर्यींकरण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही  ते म्हणाले.

कोरोना नंतरच्या काळात आपण जगत आहोत, वर्तमानात सर्वच बाबतीत संतुलन राखणे गरजेचे असून राज्य सरकार म्हणून शासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वित्त असो वा खाजगी वित्त असो यामध्ये संतुलन ठेवावेच लागेल तेव्हाच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो, असे श्री ठाकरे म्हणाले.

रायसीना  डायलॉग या कार्यक्रमात खासदार शशी थरूर यांनी  श्री ठाकरे यांची वायुप्रदूषण संकटावर मात कशी करता येऊ शकते, राज्य सरकार यासाठी काय पाऊले उचलली आहेत या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला. 

हरित वित्तपुरवठा आणि ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय सहाकार्य वाढविण्यासाठी  श्री ठाकरे आणि जपान बँकेचे गव्हर्नर तदाशी मैदा यांच्याशी चर्चा केली.