आकांक्षित जिल्हयाच्या अनुषंगाने राज्यशासनाच्या समन्वयाने काही विषय मार्गी लावले जातील – केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार

उस्मानाबाद,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- आकांक्षित जिल्हयांच्या अनुषंगाने या जिल्हयात विविध योजना राबविल्या जात आहेत.त्यात काही राज्याच्या तर काही योजना केंद्र  शासनाच्या आहेत.तथापि, काही योजनांच्या अनुषंगाने जेथे राज्य शासनाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर राज्याशी समन्वय साधून काम केले जाईल.त्यासाठी अधिकाऱ्यांनी आपआपल्या विभागाचे प्रस्ताव पाठविताना ते योग्य प्रकारे राज्य शासनाकडे पाठवून ते केंद्रशासनाकडे जाण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्याची आवश्यकता असते ते काम करावे,असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज येथे केले.
यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर,अपर जिल्हाधिकारी रुपाली अवले,जि.प.चे अप्पर मुख्यकर्यकारी अधिकारी विकास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.डी.के.पाटील,जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ. नितीन बोडके,जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तीर्थनकर, सहायक नियेाजन अधिकारी श्रीकांत कुंटला जिल्हयातील  सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आकांक्षित जिल्हयांच्या अनुषंगाने कृषी विभागाने गेल्या दोन वर्षात केलेल्या कामांचा आढावा घेत असताने जिल्हयाने सिंचन व सुक्ष्म सिंचन क्षेत्रात केलेल्या कामामुळे सलग दोन वर्ष निति आयोगाने तीन-तीन कोटी रुपयांचे बक्षिस विविध योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी यावेळी दिली.जिल्हयात पोखरा आणि पंतप्रधान सिंचन योजना आणि जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यामातून  सिंचन प्रकल्पाचे बळकटीकरण ,दुरुस्त्या आणि सुक्ष्म तसेच ठिबक सिचनाच्या कामास प्राधान्य दिल्याने जिल्हयातील सुक्ष्म सिंचनाचे प्रमाण 4.2 टक्यांवरून 11.84 टक्यापर्यंत वाढण्यास मदत झाल्याचे यावेळी श्री.तीर्थकर यांनी सांगितले यापूर्वी कृषी विमा 88 कोटी रुपये दिला होता, तो गेल्या वर्षी  380  कोटी रुपये देण्यात आला.तर जिल्हयातील शेतकऱ्यांना या पूर्वी पीक कर्ज 733 कोटी 67 लक्ष रुपयांचे देण्यात आले होते ते यावर्षी 1232 कोटी रुपयांपर्यंत  देण्यात आले.राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हयात तृण धान्याचे प्रामुख्याने हारभऱ्याच्या  बियाणाचे वाटप करण्यात आले.जिल्हयात दोन बाजार समिंत्यात ई – नाम पध्दतीचा अवलंब करण्यात आला आहे,उर्वरीत ठिकाणी लवकरच ई –नाम पध्दतीचा आवलंब केला जाईल,अशी यावेळी माहिती देण्यात आली,त्यावर डॉ.पवार यांनी हे काम जलद गतीने करावे,शेतकऱ्यांना घरगुती बियाणे वापरण्यासाठी प्रोत्साहान द्यावे,गहू व भाताचे उत्पन्न जिल्हयात खुपच कमी घेतले जाते,याबाबत योग्य ती माहिती केंद्र सरकारला द्यावी.कोणत्या पिकांचे प्रमाण वाढले आहे,खरीप  आणि रब्बी पिकांच्या क्षेत्राच्या अनुषंगाने विविध पिकांसाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक खतांची  राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे मागणी करावी.उस्मानाबाद रेल्वे स्टेशनवर खत ठेवण्यासाठी शेड उभारण्याच्या मागणीचा प्रस्ताव दाखल करावा.जिल्हयात फळबागाचे क्षेत्र वाढत आहे.तसेच उसाचे क्षेत्रही वाढत आहे,त्या अनुषंगाने नियोजन करावे,अशा सूचनाही डॉ.पवार यांनी यावेळी केल्या.
जिल्हयात जनावरांची एकूण संख्या 5 लाख 49 हजार 344 आहे.त्यापैकी 5 लाख 44 हजार 344 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे,लसीकरणाचे हे प्रमाण 92 टक्यापेक्षा अधिक आहे. सुमारे दोन लाखा पेक्षा अधिक खातेदारांना मातीच्या आरोग्याचे कार्ड दिले आहेत.आता जिल्हयातील एका गावाची निवड करून येथील माती परिक्षण केले जात आहे.जिल्हयात नऊ हजार मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले आहे.त्यापैकी 6000 मुलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे.या वर्षी 1500 मुलांना प्रशिक्षण देण्याचे उदिष्ट आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.त्यात आदिवासी मुलांच्या प्रशिक्षणाची माहिती आदिवासी विभागाकडून घेऊन ती माहिती परिपूर्ण करावी, अशी सूचनाही डॉ.भारती पवार यांनी यावेळी दिली.
घरगुती वीज कनेक्शनचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर फायबर ऑप्टीकलव्दारे इंटरनेट कनेक्टीव्हीटी देण्याबाबत जिल्ह्यातील एकूण 622 ग्रामपंचायतींपैकी 616 ग्रामपंचायती पर्यंत ही सेवा देण्याचे काम पूर्ण होत आहे. 339 ग्राम पंचायतीत प्रत्यक्षात ही सेवा सुरु झाली आहे. उर्वरित ग्रामपंचायतीत ती लवकरच सुरु होईल, अशी माहिती देण्यात आली, असता डॉ.पवार यांनी समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात 100 टक्के स्वच्छताग्रह बांधकाम करण्यात आले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट 90,013 चे आहे. त्यापैकी 17 हजार 435 घरांना नळाद्वारे पाणी दिले जात आहे. येत्या 2024 पर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले, त्यावर डॉ.पवार यांनी या कामास गती देण्याची सूचना केली.
जिल्ह्यात 44 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्यापैकी 42 आरोग्य केंद्र स्वत:च्या इमारतीत आहेत तर दोन आरोग्य केंद्रांच्या इमारतींचे बांधकाम सुरु आहे. जिल्ह्यात 215 आरोग्य उपकेंद्र मंजूर आहेत. त्यापैकी 211 आरोग्य उपकेंद्र सुरु आहेत. त्यापैकी 205 उपकेंद्र स्वत:च्या इमारतीत आहेत. उर्वरित काहींचे बांधकाम सुरु आहे. तर काही उपकेंद्रासाठी गावांमध्ये जागेचा शोध सुरु आहे. लवकरच जागा उपलब्ध करुन या आरोग्य केंद्रांचे बांधकाम करण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. जिल्ह्यातील जिल्हा स्त्री रुग्णालयात ग्रामीण भागातून शिफारस केलेल्या 2492 प्रकरणांमध्ये 1203 प्रकरणांमध्ये नॉर्मल प्रसुती करण्यात आली, तर 549 सिझर करण्यात आली. इतर प्रकरणे 740 होती. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात संस्थात्मक प्रसुती होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयांवर पडणारा ताण लक्षात घेता येथे 200 खाटांचे स्त्री रुग्णालय करण्याचा प्रस्ताव दाखल करावा, तसेच होऊ घातलेल्या वैद्यकीय महाविद्यालयात 60 खाटांचे स्त्री रुग्णालय प्रस्तावित करावे, अशी सूचना डॉ.पवार यांनी केली तर नादुरूस्त असलेले  डायलेसिसचे मशीन त्वरित सुरू करून घ्यावेत.जिल्हा वार्षिक योजना आणि सीएसआर अंतर्गत  आणखीन चार मशीन खरेदी करण्याचा तसेच जिल्हयात प्रधानमंत्री डायलेसिसचे मशीन केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव द्यावा, अशी सूचना डॉ.पवार यांनी केली.
आयुष्यमान भारतअंतर्गत जिल्हयात पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाख आहे.त्यापैकी 75 हजार जणांना भारत ई कार्डचे वाटप केले आहे.येत्या 1 मे च्या ग्रामसभेत याबाबत माहिती देऊन या कामाला गती देऊन विशिष्ट कालावधीत कार्ड वाटपाचे काम पूर्ण करावे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील पाच लाभार्थ्याना    प्रतिनिधिक स्वरूपात  भारत ई कार्डचे वाटप यावेळी डॉ.पवार यांच्या हस्ते करण्यात आले.तुळजा भवानी मंदीरातील प्रसाद योजनेचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात यावा, त्यासाठी मी स्वत: पाठ पुराव करेन असेही डॉ.पवार म्हणाल्या. सोलापूर, तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जमीनीच्या मोजणीचे काम सुरू आहे. हे काम जून 2022 पर्यंत पूर्ण करण्यात येईल,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय – केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार

कोरोना काळातील आशाताईंचे योगदान अविस्मरणीय – केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार

उस्मानाबाद,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी आज येथील स्त्री रुग्णालयास भेट देऊन येथील आरोग्य विषयक सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत आमदार राणा जगजीतसिंह पाटील,जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.डी.के पाटील आदी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान रुग्णालयात वर्षभरामध्ये किती महिलांच्या प्रसूती झाल्या, किती मुला-मुलींचा जन्म झाला, यासोबतच किती खाटा उपलब्ध आहेत, दररोज किती महिला रुग्ण रुग्णालयात भरती होतात, कोणकोणत्या सोयी उपलब्ध आहेत, इमारत कशी आहे, खाटा व्यवस्थित आहेत की नाही, महिला रुग्णांना कोणत्या आरोग्य सुविधा पुरविण्यात येतात, भोजनाचा दर्जा कसा आहे, आरोग्य कर्मचारी, परिचारिका, अधिपरिचारिका, डॉक्टरांचे संख्याबळ पुरेशे आहे किंवा नाही, आदींबाबत निरीक्षण केले.यावेळी डॉ.पवार यांच्या हस्ते नवजात बालकांचे आधार कार्ड नोंदणीची सुरुवात करण्यात आली. तसेच  त्यांनी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिला रुग्णांशी संवाद साधला आणि विचारपूसही केली.