देशात यंदा सरासरीच्या ९९ टक्के पाऊस!

नवी दिल्ली ,१४ एप्रिल /प्रतिनिधी :- भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या मान्सूनच्या पहिल्या अंदाजानुसार यावर्षी देशात सरासरीच्या ९९ टक्के पाऊस पडणार आहे. यासंदर्भात हवामान विभागाने ट्विट करत माहिती दिली आहे.

कोरोना, महागाई आणि इतर संकटांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांसाठी यंदा चांगला पाऊस पडेल ही दिलासा देणारी बातमी आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी देखील मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच. पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यानुसार भारतीय हवामान विभागाने आज आपला जाहीर केलेला अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा ९९ टक्के पाऊस होणार असल्याने सर्वांसाठीचं ही आनंदवार्ता आहे.

जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. एकूण पावसाच्या ७४ टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. उत्तम पर्जन्यमानाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मागील दोन दिवसापूर्वीच हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या ९८ टक्के राहण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेन वर्तवली होती. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन आहे. स्कायमेटने यापूर्वी २१ फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असे सांगितले होते.