सोमय्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा:मात्र सलग चारदिवस हजर राहण्याचे आदेश

मुंबई,१३ एप्रिल /प्रतिनिधी :-  आयएनएस विक्रांत निधी प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला असून, न्यायालयाने किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास ५० हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशामुळे सोमय्या यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र, न्यायालयाने सोमवारपासून (दि.१८) सलग चार दिवस चौकशीला हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.

आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत सोमय्यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला असून, याप्रकरणी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमय्या यांनी ‘विक्रांत’ युद्धनौका जतन करण्यासाठी २०१३ मध्ये नागरिकांकडून निधी गोळा केला होता. त्याची सुमारे ५७ कोटी रुपयांची रक्कम अद्याप सरकारकडे जमा झालेली नाही. त्याबाबत माजी लष्करी जवानाने फौजदारी फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमय्या पिता-पुत्रांना समन्स बजावले होते. मात्र, सोमय्या चौकशीला गैरहजर राहिले. दोघांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, संबंधित रकमेबाबत समाधानकारक माहिती सोमय्या यांच्या वतीने न्यायालयात दाखल करण्यात आली नाही, असे निरीक्षण नोंदवून न्या. आर. एन. रोकडे यांनी त्यांचा जमीन अर्ज नामंजूर केला. होता. त्यानंतर किरीट सोमय्यांनी अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने वरील निकाल दिला आहे.