मृत्यूदर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश- जिल्हाधिकारी उदय चौधरी

औरंगाबाद दि. 18:- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला रोखताना मृत्यूदर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत आहे. यंत्रणा युद्धपातळीवर रुग्णांना तत्परतेने उपचार उपलब्ध होण्यासाठी आणि कोवीडचा प्रसार थांबवण्याच्या दृष्टीने सर्व आवश्यक उपाययोजना प्रभावीरीत्या राबवीत असल्याची माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी श्री.चौधरी बोलत होते.यावेळी मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यातील संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून रुग्ण संख्या वाढत असताना पहिल्या 5 हजार रुग्णांमध्ये 247 मृत्यू होते. नंतरच्या 5 हजारात केवळ 140 मृत्यू झाले असून मृत्यू दर कमी करण्याच्या प्रयत्नांना यश मिळत असून सोळा जून रोजी 6.61 टक्के असलेला मृत्यू दर जवळपास दोन टक्क्यांनी कमी करून आज रोजी 3.80 टक्क्यांवर आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. रुग्ण व्यवस्थापनामुळे वेळेत उपचार उपलब्ध होणे , उपचार सुविधामध्ये वाढ आणि गंभीर रुग्णांवर यशस्वी उपचार होत असल्याने मृत्यूचे प्रमाण कमी होत असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्ह्यात आयसीएमआरच्या सूचनांनुसार अँटीजन टेस्टिंग सुरू झाल्या असून 18478 अँटीजन टेस्टिंग मध्ये 887 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर आठवडाभरात 8000 पीसीआर चाचण्या झाल्या आहेत.यात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आला तर तो पॉझिटिव्ह ग्राह्य धरला जाणार असून त्याच्यावर उपचार करण्यात येणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, संचारबंदी मध्ये 1000 पेक्षा जास्त रुग्णांना शोधून काढले आहेत. ह्यामुळे कोरोनाचा प्रसार कमी होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील रुग्ण आढळलेल्या 118 गावांपैकी 19 गावात दहापेक्षा जास्त रुग्ण असून 76 गावात सध्या एकही रुग्ण नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

मनपा आयुक्त श्री.पांडेय म्हणाले, शहरातील 50 पेक्षा जास्त वय असलेल्या नऊ हजार लोकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. वक्वारंटाईन कक्ष, कोवीड केअर सेंटरची क्षमताही वाढवलेली आहे. संसर्ग रोखण्यासाठी भाजीपाला, दूध ,सलून, दुकानदारांच्या तपासण्या करण्यात येणार आहे.त्यासाठी 25 तपासणी पथक तयार केले आहेत. त्याचप्रमाणे एमएचएमएच अँप आणि पालिकेच्या वाॅररुम द्वारे चौदा हजार नागरिकांना आरोग्य सल्ला, उपचार देण्यात आले असून एमएचएमएच अँपमध्ये खाटांची माहिती उपलब्ध होत असून नागरिकांना ती उपयोगी आहे.तसेच शहरात एकूण 50000 चाचण्या केल्या असून सिटी एंट्री पाॅइंटवर सहा ठिकाणांवर 700 रुग्ण शोधण्यात आले तर मोबाईल व्हॅन फोर्सद्वारे 20000 अँटीजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. तसेच चिकलठाणा, रेल्वे स्टेशन, एमआयडीसी भागात ही रुग्ण तपासणी करण्यात येणार असल्याचे श्री.पांडेय यांनी सांगितले.

पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी जनतेने संचारबंदीचे यशस्वी पालन केल्याबद्दल आभार व्यक्त केले. तसेच या काळात शहरात 353 खाली एकही केस नोंद झाली नाही ही चांगली गोष्ट असल्याचे सांगून या पुढेही नियमांचे पालन करत प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *