समान नागरी कायदा आणा आणि लोकसंख्येवर आळा घाला-राज ठाकरे यांची मोदी सरकारकडे मागणी

रमजान ईदपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर हनुमान चालिसा लावणारच-राज ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा

May be an image of 1 person, standing and outdoors

ठाणे,१२ एप्रिल  /प्रतिनिधी :- देशात समान नागरी कायदा आणा, तसेच लोकसंख्या नियंत्रण करणारा कायदाही आणा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत केली.

यावेळी ते म्हणाले की, मी ईडीमुळे ट्रॅक बदलला हा गैरसमज आहे, मला ट्रॅक बदलावा लागत नाही. वेळ आल्यास मी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही बोलेन. मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा, असे म्हणणारा पहिला माणूस मी होतो. त्यानंतर बाकीचे बोललेत. मी एखादं स्वप्न एका पंतप्रधानाकडून पाहतो. ३० वर्षांनंतर एका व्यक्तीला पूर्ण बहुमत मिळाल्यावर ज्या गोष्टी व्हायला हव्या होत्या त्याबाबत मी एका भाषणातही बोललो होतो. मी उघडपणे मोदींच्या भूमिकांविषयी बोललो. पण काश्मीरमधलं ३७० कलम त्यांनी रद्द केलं, तेव्हा अभिनंदन करणारं पहिलं ट्वीट माझं होतं. आजही माझं मोदींना सांगणं आहे. दोन मागण्या पूर्ण करा, खूप मोठे उपकार होतील. एक तर देशात समान नागरी कायदा आणा आणि दुसरं देशातल्या लोकसंख्येवर नियंत्रण आणता येईल असा कायदा आणा. आम्हाला आसूया नाही की आमच्याकडे एक आणि तुमच्याकडे पाच-पाच. पण ज्याप्रकारे लोकसंख्या वाढतेय, हा देश एक दिवस फुटेल. या काही गोष्टी देशात होणं गरजेचं आहे. आवश्यक आहेत, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.

May be an image of one or more people, outdoors and crowd

त्याआधी, सभेला सुरुवात करतानाच त्यांनी सांगितले की, माझ्या सभेपूर्वी पोलिसांचा आपल्याला फोन आला त्यावेळी त्यांनी माझा ताफा काही छोट्या संघटना अडवणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर उत्तर देताना माझा ताफा अडवणार हे पोलिसांना कळलं मात्र, पवारांच्या घरी एसटी कर्मचारी जाणार हे पोलिसांना कळलं नाही का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. गुढीपाडव्याची सभा झाल्यानंतर अनेकांनी तारे तोडल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.

दरम्यान, मनसेकडून ठाण्यातील उत्तर सभेपूर्वी तीन टीझर रीलीज केले होते. 9 एप्रिल रोजी मनसेकडून करारा जबाब मिलेगा #उत्तर सभा अशी टॅग लाईन देत एक टीझर रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर मंगळवारी ”वारं खुप सुटलंय आणि जे सुटलंय ते आपलेच आहे” असा उल्लेख करत दुसरा तर, त्यानंतर लाव रे तो व्हिडिओ असा उल्लेख करत तिसरा टीझर रिलीज करण्यात आला. गुढीपाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याला चांगलाच विरोध दर्शविला होता. त्यानंतर राज ठाकरेंच्या भाषणावर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या होत्या.

राज ठाकरे यांचा निर्वाणीचा इशारा

रमजान ईदपर्यंत (३ मे) भोंगे उतरवले नाहीत तर राज्यात जिथे भोंगे दिसतील तिथे हनुमान चालिसा लावणारच, असा ठाम निर्धार राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत व्यक्त केला.

लॉकडाऊनमध्ये अजित पवारांचा कान साफ झाला असणार. गुढी पाडव्याचा भोंगा ऐकू आला. मी चुकीचे काय बोललो. मशिदींवरच्या भोंग्यांचा अख्ख्या देशाला त्रास होतोय. यात धार्मिक विषय कुठंय? तुम्हाला जी आजान द्यायचीये, ती घरात द्या. शहरांचे रस्ते, फुटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे. आम्हाला का ऐकवताय? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर आम्ही हनुमान चालीसा लावणार म्हणजे लावणारच! वातावरण आम्ही बिघडवत नाही. हा धार्मिक विषय नसून सामाजिक विषय आहे. वयस्कर लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, सगळ्यांना याचा त्रास होतो. एक तर सगळे बेसूर असतात. रस्त्यावर घाण झाली, फुटपाथवर घाण झाली तर ते आपण साफ करतो. मग कानांना त्रास होत असेल, तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला सांगतो, यातून मागे हटणार नाही. तुम्हाला काय करायचं ते करा. या गोष्टीचा एकदा सोक्षमोक्ष लागलाच पाहिजे. परदेशात अनेक ठिकाणी बंदी आहे, तिथे निमूटपणे ऐकता ना? माझ्या परिचयाची मुस्लीम लोकं येऊन सांगतात की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. असा कोणता धर्म आहे जो इतर धर्मीयांना त्रास देतो? आज रमजान चालू आहे, आम्ही समजू शकतो. आमचाही गणपती उत्सव असतो. नवरात्रौत्सव असतो. १० दिवसांत आपण समजू शकतो, तरीही तो लाऊडस्पीकर कमीच लावला पाहिजे, तो भाग वेगळा. सणवार असेल तर आपण समजू शकतो. पण ३६५ दिवस तुम्ही या लाऊडस्पीकरमधून गोष्टी ऐकवता, कशासाठी? असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

३ तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की कुठलीही तेढ, दंगल निर्माण करायची नाही. आम्हाला त्याची इच्छा देखील नाही. महाराष्ट्राचं स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. आज १२ तारीख आहे. १२ एप्रिल ते ३ मे, महाराष्ट्रातल्या सगळ्या मशिदींमधल्या मौलवींशी तुम्ही बोला, त्यांना सांगा, सगळे लाऊडस्पीकर खाली उतरवले पाहिजेत, ३ तारखेनंतर तुम्हाला आमच्याकडून कोणताही त्रास होणार नाही. १८ जुलैला सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी असेल, तर राज्याच्या गृहखात्याला त्याची अंमलबजावणी करायला काय प्रॉब्लेम आहे? हे मतांसाठी होत नाही का? मग आम्ही हे उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं का? हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे की देशात जिथे कुठे बांग सुरू असेल, तिथे हनुमान चालीसा लागलीच पाहिजे. आम्हाला काय त्रास होतो, तो एकदा त्यांना होऊ देत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही, असे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचाही खरपूस समाचार घेतला. यांची बाजू घेणारे इकडचे आव्हाड. काय पण चेहरा आहे.. नागानं फणा काढावा, असा चेहरा आहे. उद्या काहीतरी म्हणेलच, डसू शकतो वगैरे.. ये.. शेपूट धरतो, गरगर फिरवतो आणि फेकून देतो. राज ठाकरेंनी म्हणे सांगितल्याप्रमाणे कुठल्या मदरशांमध्ये वस्तरा जरी सापडला, तरी मी संन्यास घेईन. सापडेल कसा? दाढी करतच नाहीत. बरं इकडून-तिकडून तुला वस्तरा दिसला? याच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. राज ठाकरेंनी यावेळी मुंब्र्यातून अटक अतिरेक्यांची यादीच वाचून दाखवली.

२४ ऑगस्ट २००१ सीमीच्या सहा हस्तकांना अटक, २० डिसेंबर २००१ अबु हमजा, १६ मार्च २०२० हिजबुल मुजाहिदिनी चार अतिरेक्यांना अटक, २३ जानेवारी २००४ एक दहशतवादी जेरबंद, २०१६ ला ताब्यात घेतला आयसीसचा मोरक्या, १६ मे २००३ मुलुंड बॉम्बस्फोटप्रकरणी एकाला अटक, रिजवान मोबिन या संशयित अतिरेक्याला अटक, २६ जानेवारी २०१९ एका दहशतवाद्याला अटक…. आता तुम्ही म्हणाल, वस्तरा नाही सापडला. आता कसा संन्यास घेणार. मी कुठे म्हटलो होतो की अतिरेकी सापडणार नाहीत. या अशा असंख्य घटना देशातल्या अनेक मदरशांमध्ये चाललेल्या आहेत. पाकिस्तानी अतिरेकी, शस्त्र सापडत आहेत. यात देशावर खरंच प्रेम करणारा मुसलमान भरडला जातोय.
सलीम मामा शेख याच्या मतदारसंघात ९५ टक्के हिंदू लोक राहतात. पण सलीम निवडून येतो. याचं कारण हे मराठी मुसलमान. देशावर प्रेम करणारे, प्रामाणिक राहणारे मुसलमान. देशात धर्माचा अतिरेक करणारे जे लोक आहेत, त्यांच्यामुळे हे मुसलमान भरडले जात आहेत.

Image

राज ठाकरेंचा थेट शरद पवारांवर निशाणा!

“शरद पवार हे स्वत: नास्तिक असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने राजकारण समजवण्याचा प्रयत्न करत असतात”, असं म्हणतानाच राज ठाकरेंनी शरद पवारांवर परखड शब्दांत निशाणा साधला आहे.

भूमिका बदलण्यावर शरद पवारांनी बोलावं?

शरद पवार म्हणतात, मी जातीयवाद भडकवतो. बरं शरद पवारांनी सांगावं की राज ठाकरे त्याची भूमिका बदलतो? राष्ट्रवादी काँग्रेसनं हे बोलावं? परदेशी पंतप्रधान चालणार नाही हे बोलणारे बाळासाहेब ठाकरे पहिले होते. तो धागा पकडून शरद पवार ९९ ला काँग्रेसमधून बाहेर पडले. निवडणुकांचा निकाल लागला आणि परत काँग्रेसमध्ये गेले आणि कृषीमंत्री झाले. दोन महिन्यांत भूमिका बदलली. शरद पवारांनी आत्तापर्यंत असंख्य भूमिका बदलल्या. हे काय मला सांगतायत. मी कोणती भूमिका बदलली? हिंदुत्वाची भूमिका मी आज नाही आणलीये. पाकिस्तानी कलाकारांना ढुंगणावर लाथ मारू हाकलण्याची भूमिका घेणारा पक्ष कोणता होता? पाकिस्तानी कलाकारांना घ्याल, तर याद राखा ही नोटीस सगळ्या निर्मात्यांना कुणाकडून गेली होती? आझाद मैदानावर रझा अकादमीनं मोर्चा काढला, पोलीस भगिनींना मारलं, पत्रकारांच्या गाड्या फोडल्या, पोलिसांना मारलं. कुणीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्याविरोधात फक्त मनसेनं मोर्चा काढला. त्यानंतर तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर अरुप पटनायक आमच्या पोलिसांवरच डाफरत होते. हे पोलिसांना सांगत होते की त्यांना मारायचं नाही. तो मोर्चा आरूप पटनायक यांना मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यासाठी. त्यानंतर अरूण पटनायक यांना पोलीस आयुक्त पदावरून काढून टाकण्यात आलं. तो मोर्चा आमचा होता.

शरद पवार साहेब, काय चाललंय? तुमच्यासारख्या बुजुर्ग माणसानं या महाराष्ट्रातला जातीपातीचा भेद गाडून टाकला पाहिजे. तुम्ही यासाठी प्रयत्न केला पाहिजे. पण तुमच्या राजकीय स्वार्थासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय. शरद पवारांकडे अनेक घेण्यासारखे गुण आहेत. पण याचं काय करायचं?” असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

सगळे गुढी पाडव्याच्या सभेनंतर एकदम सरफटले. एकच पालुपद लावलं की ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या मालमत्ता जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या द्यायला लागले. काय तरी पत्रकार परिषदेतली भाषा. वर्तमानपत्राचा संपादक पत्रकार परिषदेत येऊन भ**, चु** शब्द वापरतो. अंगाशी आलं म्हणून हे होतंय. यांच्यासाठी आमच्या आजोबांनी शब्द काढला होता. हे सगळे ‘लवंडे’… म्हणजे काय? पूर्वी जेवायला पत्रावळ्या असायच्या. त्यातला द्रोण वरण-आमटी पडली की लवंडायचं. तसे हे लवंडे.. शिवसेनेकडून पडलं की तिकडे लवंडायचं, राष्ट्रवादीकडून पडलं की तिकडे लवंडायचं., अशा शब्दांत राज ठाकरे यांनी चौफेर फटकारे लगावले.

म्हणून शरद पवार कधी शिवाजी महाराजांचं नाव घेत नाहीत

“शरद पवार भूमिका मांडताना म्हणतात हा महाराष्ट्र शाहू-फुले-आंबेडकरांचा आहे. पण त्याआधी आमचा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. शरद पवार कधीही तुम्हाला छत्रपतींचं नाव घेताना दिसणार नाही. छत्रपतींचं नाव घेतलं आणि मुसलमान मतं गेली तर काय करायचं? म्हणून ते छत्रपतींचं नाव घेत नाहीत. मग छत्रपतींवरचं राजकारण करायचं असेल, मराठ्यांची माथी भडकवायची असतील… त्यांच्याच एका भाषणात अफजलखान इथे आला, तेव्हा महाराजांनी त्याचा कोथळा बाहेर काढला होता. तो हिंदू-मुस्लीम नव्हता म्हणे. मग तो आला कशासाठी होता? तो काय केसरी टूर्स, वीणा वर्ल्डचं तिकीट घेऊन महाराष्ट्र दर्शनासाठी आला होता का?” असा टोला राज ठाकरेंनी लगावला आहे.

“शपथविधीनंतर शरद पवारांनी आवाज काढला”

राज ठाकरेंनी सकाळच्या वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची आठवण करून दिली. “तो जो सकाळचा शपथविधी झाला, त्यानंतर शरद पवारांनी जो आवाज काढला, त्यानंतर अजित पवारांना तीन-चार महिने ऐकू येत नव्हतं काही. त्यानंतर त्यांना कानात कूं-कूं असा आवाज ऐकू येत होता. त्यामुळे मी जे काही बोललो, ते त्यांना कळलंच नाही”, असं राज ठाकरे म्हणाले.

सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे – राज ठाकरे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले,”सुप्रिया सुळे म्हणतात, लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटिशीने बदलतील याचं मला आश्चर्य वाटतं. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की एकाच घरात राहून अजित पवारांच्या घरी रेड पडते, पण तुमच्या घरी रेड पडत नाही याचं कारण मला कळेल का? सुप्रिया सुळेंनी बोलायचं नाही. यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”.

राज ठाकरे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेसंदर्भात बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज यांना आलेला ईडीच्या नोटीशीचा संदर्भ देत टीका केली होती. “लाव रे तो व्हिडीओ म्हणणारे एका नोटीशीमुळे एवढे बदलतील याचं मला कौतुक आणि आश्चर्य वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, त्यांनी हा आरोप याआधीही केलाय. अशा गोष्टींमध्ये इनकनस्टीस्टंटली कन्सीस्टंट आहेत,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.