पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील- परिवहन मंत्री अनिल परब

पुणे,३ एप्रिल /प्रतिनिधी :- पर्यावरण बदलाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इलेक्ट्रिकल वाहन धोरण आणले असून याचाच एक भाग म्हणून समाजात जनजागृती व्हावी यासाठी पर्यायी इंधनावर आधारित वाहनांच्या रॅलीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यायी इंधन वाहन ग्रीन मोबिलिटीमध्ये महाराष्ट्र देशात अग्रेसर राहील, असा विश्वास परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी व्यक्त केला.

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांच्याहस्ते पर्यायी इंधन परिषदेच्या रॅलीचा नवीन कृषी मैदान येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी भारत ससाणे, एमआयडीसीचे महाव्यवस्थापक अभिजित घोरपडे, प्रादेशिक अधिकारी संजीव अधिकारी संजीव देशमुख,अविनाश हदगल, एमसीसीआयएचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत गिरबाने आदी उपस्थित होते.

अॅड.परब म्हणाले, पर्यावरण बदलांमध्ये गाड्यांच्या माध्यमातून होणारे प्रदूषण हे एक मोठे करण आहे. यामध्ये बदल करायचे असेल तर आपल्याला पर्यायी इंधनाकडे वळावे लागेल. या रॅलीमध्ये जवळपास ३५० इलेक्ट्रिकल वाहन सहभागी झाले आहेत. यावरुन आपली वाटचाल योग्यदिशेने सुरू असल्याचे लक्षात येते. या धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अशाप्रत्येक उपक्रमाला राज्यशासन प्रोत्साहन देईल, असे आश्वासन श्री. परब यांनी दिले.

पोलीस आयुक्त गुप्ता म्हणाले, नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इलेक्ट्रिकल वाहनाच्या बॅटरीमध्ये सुधारणा होत आहे. त्यामुळे इलेक्ट्रिकल वाहन वापरण्याचे सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

पर्यावरण बदलाचा मानवी जीवनावर होणारा दुष्परिणाम तसेच इलेक्ट्रिकल वाहन धोरणाचा प्रसार-प्रचार करुन समाजात जनजागृती होण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे श्री. गिरबाने म्हणाले.