गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे

नववर्षापासून नवीन संकल्प करुयात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक

गुढीपाडवा तसेच त्यावेळी निघणाऱ्या शोभायात्रा अत्यंत उत्साहाने साजऱ्या करता येणार

मुंबई, ३१ मार्च /प्रतिनिधी :- गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरुवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले.

गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमुखाने आणि एकदिलाने राज्य शासनाच्या प्रयत्नांना बळ दिले, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी या सर्वांना देखील मन:पूर्वक धन्यवाद दिले. या संपूर्ण काळात राज्यातील विविध जाती-धर्म आणि पंथाच्या नागरिकांनी त्यांच्या सण, उत्सव तसेच समारंभांना देखील मर्यादित ठेवले व संयम पाळला. पोलीस यंत्रणा, पालिका-नगरपालिका, महसूल व ग्रामविकास यंत्रणा आणि एकूणच प्रशासनाने कोरोनाचा दिवस रात्र मुकाबला केला, याविषयी मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले तसेच सर्वांचे मनापासून आभार देखील मानले.

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्य सरकारची सकारात्मक घोषणा – राजेश टोपे

राज्यात मागील दोन वर्षांपासून कोरोना संक्रमण काळात अनेक निर्बंध लावण्यात आले होते. राज्य सरकारच्या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान या निर्बंधांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली. राज्यातील कोरोना काळातील निर्बंध गुढीपाडवा सणापासून पूर्णपणे हटवण्यात येणार असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. निर्बंध हटवण्यात आले असले तरीदेखील काळजी घेतलीच पाहीजे, असे आवाहनही टोपे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. लोकांनी स्वत:ची आणि सार्वजनिक ठिकाणी इतर लोकांची काळजी घेणे हे महत्त्वाचे आहे. यासाठी मास्क घालणे हे ऐच्छिक असले तरी आवश्यक असल्याचे टोपे यांनी सांगितले.

त्यामुळे गुढीपाडवा तसेच त्यावेळी निघणाऱ्या शोभायात्रा आपल्याला अत्यंत उत्साहाने साजऱ्या करता येतील. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यासोबतच येणारे इतर सण पूर्ण उत्साहाने साजरे करता येतील, अशी बाब त्यांनी मांडली. जगात अनेक देशांमध्ये मास्क मुक्ती करण्यात आली आहे. परंतु मुख्यंमत्री यांनी केंद्र सरकार, टास्क फोर्सशी केलेल्या चर्चेअंती हा निर्णय घेतला असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

तसेच आरोग्य विभागातील ४० ते ५० वयोगटातील शासकीय कर्मचाऱ्यांना दोन वर्षात एकदा पाच हजार रूपयांच्या मर्यादेपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आवश्यक चाचण्या करण्यास मान्यता देण्यात आली आहे. ५० ते ६० वयोगटातील कर्मचाऱ्यांना दरवर्षी या चाचण्या करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी १०५ कोटी रुपयांचा निधी मान्य करण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.