मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नाही – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

विधानसभा प्रश्नोत्तरे

मुंबई,२४ मार्च  /प्रतिनिधी :-मुंबईत होऊ घातलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेला कोणताही धोका नाही, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

सदस्य अमित साटम यांनी नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलतांना याबाबत वक्तव्य केले होते. यावर गृहमंत्री श्री. वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

आयपीएलच्या पार्श्वभूमीवर वानखेडे स्टेडियम आणि ट्रायडेंट हॅाटेलवर दहशतवादी हल्ला करण्याबाबत कोणतीही धमकी मिळाली नाही. खेळाडूंची निवास व्यवस्था असलेल्या हॉटेल्सची दहशतवाद्यांनी रेकी केली असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात येत आहेत. या वृत्ताचे खंडण करून अशी कोणतीही धमकी आणि रेकी करण्यात आली नाही, मुंबईतील आयपीएलला कोणताही धोका नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पोलीसांनीही केले आहे, असे गृहमंत्री श्री. वळसे-पाटील यांनी सांगितले.