‘शिवसंपर्क अभियान’ पंचायत समिती गण पातळीपर्यंत राबवा – पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे जिल्हाप्रमुखाना आदेश
जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे राज्यातील शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांशी संवाद साधला. शिवसंपर्क अभियान
मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वप्रथम सर्वांचे अभिनंदन केले व दुसऱ्या टप्प्यातील हे शिवसंपर्क अभियान पंचायत समिती गण पातळीपर्यंत जाऊन राबविण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यात दि.२२ ते २५ मार्च दरम्यान शिवसंपर्क अभियानाच्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यात एका शिवसेना खासदार यांच्या नेतृत्वाखालील १० पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ जिल्ह्याचा दौरा करणार आहे. मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सदरील शिष्टमंडळ हे शिवसेना पक्षाची संघटनात्मक बांधणी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख यांच्या नियुक्त्या व रचना, शिवसेना सदस्य नोंदणी आदी बाबीसह शासनाने राबविलेले जनहिताचे उपक्रम या संदर्भात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार
आहे.
खासदार श्रीरंग बारणे व शिष्टमंडळ हे या शिवसंपर्क मोहिमे संदर्भाने जिल्ह्यातील सविस्तर माहिती संकलित करणार आहे. या अभियानात संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, सहसंपर्कप्रमुख शिवाजीराव चोथे,
हिकमत उढाण, माजी आ.संतोष सांबरे यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे. सदरील अभियान यशस्वी करण्याकरिता शिवसेना पक्षाचे जिल्हा
परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच इत्यादी लोकप्रतिनिधी व
उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, विभागप्रमुख,
उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडी, किसान
सेना, शिक्षक सेना आदी सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी यांनी प्रयत्न
करावेत, असे अवाहन जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर व श्री.ए.जे.
बोराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.