विकासाचा अर्जुन पॅटर्न राज्यभर वापरा : महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
जालना पंचायत समितीची इमारत राज्यासाठी आदर्श ठरावी – महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार
जालना,२० मार्च /प्रतिनिधी :- जालना पंचायत समितीच्या नूतन वास्तूचे थाटात उद्दघाटनजालना /प्रतिनिधीग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेली पंचायत समितीची इमारत कॉर्पोरेट ऑफिस सारखी निर्माण करण्यासोबतच पोलिस वसाहत, विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती, शहराचा वळण रस्ता यासोबतच जालना जिल्ह्यातील पायाभूत सुविधांकरिता माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी निधी खेचून आणत विकास करून दाखवला असून त्यांच्या ” विकासाचा अर्जुन पॅटर्न ” राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वञ राबवावा असे आवाहन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे बोलताना केले.
माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या विशेष प्रयत्नांतून पूर्ण झालेल्या जालना पंचायत समितीच्या नूतन वास्तूचे उद्दघाटन शनिवारी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजेश टोपे , माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, जि. प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे हे होते. जि. प. उपाध्यक्ष महेंद्र पवार शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर ,ए. जे.बोराडे, रमेश पाटील गव्हाड, मनीष श्रीवास्तव, जि. प. सदस्य अनिरुद्ध खोतकर ,यादवराव राऊत, बबनराव खरात ,भानुदास घुगे, संतोष मोहिते,पांडुरंग डोंगरे, विष्णू पाचफुले, डॉ.आत्मानंद भक्त, फेरोज लाला तांबोळी , विमलताई पाखरे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
अब्दुल सत्तार यांनी अर्जुनराव खोतकर यांच्यासारखा लढवय्या व जनतेच्या विकासासाठी कटिबद्ध असणारा नेता जालना जिल्ह्यास लाभला हे जिल्हा वासियांचे भाग्य असून विविध योजनांतून ते विकासाची गंगा आपल्या दारापर्यंत आणत आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत व काम करून घेताना भेदाभेद न करता जनतेला अग्रस्थानी ठेवून केलेले कार्य पाहता विकासाचा अर्जुन पॅटर्न राज्यात राबवला तर राज्याचा विकास कोणीही थांबू शकणार नाही असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला. तथापि ग्रामीण भागा सोबतच शहरातील रस्ते, भुयारी गटार ,पथदिवे अशा समस्या सोडवण्यासाठी मंत्रालय पातळीवर आपले वजन वापरणारे अर्जुनराव खोतकर विकासासाठी कायम आग्रही असून त्यांच्या हाती स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या तर बोलणाऱ्या, गप्पा मारणाऱ्या व चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा हजारपट विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा आशावादही सत्तार यांनी व्यक्त केला.
पालकमंत्री राजेश टोपे यांनी ग्रामीण जनतेसाठी भव्य व सुंदर वास्तू अर्पण करताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त करून राज्य शासनाच्या विविध योजना आता अधिक सकारात्मक स्वरूपात जनतेला मिळतील. असे नमूद करत इमारतीचे कौतुक केले. सुञसंचालन जगत घुगे यांनी केले तर जि. प. अध्यक्ष उत्तमराव वानखेडे यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकारी,कर्मचारी वृंद , व शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विकासासाठी खोतकरांच्या सोबत :टोपे
शेतकरी, कष्टकरी, ग्रामीण व शहरी जनतेचे प्रश्न, तसेच दोन्ही भागांचा विकास,करतांना अर्जुनराव खोतकर हे गांभीर्याने शासन स्तरावर पाठपुरावा करतात. याचे आपण साक्षीदार असून विकासासाठी सदैव त्यांच्या सोबत आहोत. असे पालकमंत्री राजेश टोपे यांनी या वेळी नमूद केले. ग्रामीण जनतेसाठी भव्य व सुंदर वास्तू अर्पण करताना आनंद होत असल्याची भावना व्यक्त करून राज्य शासनाच्या विविध योजना आता अधिक सकारात्मक स्वरूपात जनतेला मिळतील. असे नमूद करत इमारतीचे कौतुक केले.
प्रचारकी गोडव्यापेक्षा विकास कृतीतून : अर्जुनराव खोतकर
आत्मनिर्भर आणि पारदर्शक कारभाराचे नुसते प्रचारक की गोडवे गाऊन चालत नाही तर ते प्रत्यक्षात कृतीतून करावे लागतात आमच्या ताब्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीने ते दाखवून दिले आहे अशा शब्दांत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
रेशीम बाजार पेठ, धर्मदाय कार्यालय,अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, जूना व नवीन मोंढा भागातील इमारती, विविध कार्यालयीन इमारती,पोलीस वसाहती, शहरी रस्ते, वळण रस्ता ,ग्रामीण रस्ते व विविध विकास कामे आपण मंजूर करून आणली असून विकासाचा यज्ञ अहोरात्र चालू ठेवणार असल्याची ग्वाही माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी बोलताना दिली.
65 वर्षे जुनी असलेली पंचायत समितीची इमारत विभाग वाढल्याने कर्मचारी व शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन आपण 2016मध्ये पाच कोटी रुपये इमारत बांधकाम व फर्निचर साठी मंजूर करून घेतले तथापि फर्निचर साठी निधी कमी पडल्याने अधिकचा निधी द्यावा अशी आग्रही मागणी सत्तार यांच्याकडे अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केली. दरम्यान विकासाच्या बळावर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणूका जिंकणार असल्याचे अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी सांगितले.