लातूर शहरानजीकच्या नाल्यालगत पाथवे, जॉगींग, सायकलींग ट्रॅक उभारून आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुशोभीकरण करणार -पालकमंत्री अमित देशमुख

लातूर ,१९ मार्च /प्रतिनिधी :- लातूर शहरानजीकच्या नाल्याचे पहिल्या टप्यात खोलीकरण झाल्यानंतर या नाल्यांच्या संपूर्ण लांबीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाथवे, सायकल व जॉगीक ट्रॅक उभारण्यात येतील. त्याचबरोबर परिसरात वृक्ष व फुलझाडाची लागवड करून संपूर्ण परीसराचे सौदंर्यीकरण करण्यात येईल. या निमित्ताने शहरवाशीयांना निर्सगाच्या सानिध्यात नेण्याचा एक अभिनव प्रयोग असेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते लातूर शहरानजीकच्या पाच नाल्याचे खोलीकरण आणि सुशोभिकरण कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या नाल्याच्या बाजूने आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाथवे जॉगिंग, सायकलीग ट्रॅक उभारून आणि विविध प्रकारच्या वृक्षाची लागवड करून शहरवाशीयांना निर्सगाच्या सानिध्यात नेण्याचा एक अभिनव प्रयोग या निमित्ताने राबविण्यात येत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, आयुक्त अमन मित्तल, मनपा ॲड. दीपक सूळ, श्रीशैल उटगे, जलसंपदा विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी अनिल कांबळे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी के.आर.नाबदे, जे.बी.पटेल, लातूर उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्नील पवार आदीसह संबंधित विभागाचे अधिकारी नगरसेवक, पदाधिकारी, नागरिक उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर शहरातील लातूर शहरातून सिध्देश्वर मंदिर ते मांजरा नदी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वासनगाव, दादोजी कोडदेव नगर ते वासनगाव, कन्हेरी ते कव्हा नाका, नर्सिग नगर ते कासारगाव या पाच नाल्यांच्या खोलीकरणासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ८५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचा यांत्रिक विभाग हे कामकाज करत आहे. मृद व जलसंधारण विभागामार्फत यांत्रीकीकरणाव्दारे या नाल्यांचे खोलीकरण होणार असून यातून परिसरातील जलसाठा वाढण्यास मदत होणार आहे ,असे सांगितले.

दुसऱ्या टप्प्यात या संपूर्ण नाल्यांच्या लांबीवर पाथवे, जॉगीग, सायकलीग ट्रॅक उभारण्यात येतील. तसेच नाल्यांच्या दुतर्फा वृक्ष व फुलझाडांची लागवड करून या परिसराचे सौदर्यीकरण करण्यात येईल. हे सर्व काम आंतरराष्ट्रीय दर्जाचे करण्यात येणार आहे. संबंधित विभागाने हे काम गतीने करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

या प्रकल्पासाठी नागरिकांनी सहकार्य करून सूचना कराव्यात. हा प्रकल्प अभिनव प्रकल्प म्हणून नावारूपाला येईल, असेही आवाहन पालकमंत्री श्री. देशमुख यांनी केले.

यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे म्हणाले की, पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. मनपा हद्दीतील शेतकऱ्यांची जमिनीतील वस्तीतील बोरचे पाणी रिचार्ज होईल असे सांगितले. जलसंपदा अधिकारी अनिल कांबळे यांनी नाला खोलीकरण व रुंदीकरण कामाची माहिती उपस्थितांना सविस्तर माहिती दिली.