मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा-पालकमंत्री अमित देशमुख
लातूर,१८ मार्च /प्रतिनिधी :- लातूर जिल्ह्यातील सर्व सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांचे व्यवस्थापन मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांची आज लातूर येथे संयुक्त बैठक घेऊन जिल्ह्यातील शिल्लक ऊस परिस्थितीचा आढावा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतला.
कारखाने अधिकाधिक कार्यक्षमतेने चालून जिल्ह्यातील संपूर्ण उसाचे मे अखेर गाळप होईल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश अमित देशमुख यांनी दिले.
साखर कारखान्यांनी आणि शासनाच्या कृषी विभागाने एकत्रित सर्वे करून एकूण शिल्लक ऊसाची माहिती संकलित करावी.
जास्तीत जास्त ऊस गाळप होण्यासाठी सर्व साखर कारखान्यांनी परस्परात समन्वय ठेवून एकमेकांना सहकार्य करावे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची हेळसांड होणार नाही यादृष्टीने प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क साधून उपाय योजना आखाव्यात.
अधिक दिवस साखर कारखाने चालवताना येणाऱ्या अडचणीची माहिती लेखी स्वरूपात कारखाना व्यवस्थापनाने शासनाकडे सादर करावी.
शेजारी जिल्ह्यातील कारखान्यांना आवश्यक ते सहकार्य करून ऊस घेऊन जाण्यासाठी विनंती करावी.
सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांशी संपर्क करून तेथील साखर कारखान्यातून मार्फत लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उसाचे गाळप होईल या पद्धतीचे नियोजन करावे.
मराठवाड्यातील शिल्लक उसाच्या प्रश्नावर विभागीय आयुक्तांनी माहिती संकलित करून शासनाकडे अहवाल सादर करावा.
जास्तीचे दिवस साखर कारखाना चालवल्यानंतर साखर कारखाना होणाऱ्या नुकसानीबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट कडून माहिती घेऊन शासनाकडे सादर करावी.
साखर कारखान्यांना वाहतूक अनुदान आणि ऊसतोड मजुरांना प्रोत्साहन अनुदान देण्याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून मार्गदर्शन घ्यावे.