वाढीव रजेमुळे पोलीसांवरील ताण कमी होईल

पोलीस विभागाकडून गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे मानले आभार

सातारा,१७ मार्च  /प्रतिनिधी :- गृह विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना  वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्या 20 दिवसांच्या केल्या आहेत. त्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी राज्यमंत्री श्री. देसाई म्हणाले, पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण आहे.  हा ताण कमी  करण्यासाठी  पोलीसांच्या रजा वाढल्या पाहिजेत. यासाठी गृह विभागाच्या वतीने सादर केलेल्या प्रस्तावास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी तात्काळ मान्यता देवून  पोलीसांच्या 12 किरकोळ रजेमध्ये  वाढ करुन त्या 20 किरकोळ रजा केल्या. तसेच ज्या कर्मचाऱ्याची दुसऱ्या दिवशी रजा आहे किंवा आठवडी रजा आहे अशा कर्मचाऱ्याला अगोदरच्या दिवशी  रात्रीच्या कर्तव्यावर बोलवू नये, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या