संस्कार प्रबोधिनी विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवले नैसर्गिक रंग
नैसर्गिक रंगाद्वारे धुलीवंदन साजरे करण्याची घेतली शपथ
जालना,१७ मार्च /प्रतिनिधी :- बाजारातील केमिकल मिश्रित रंगामुळे शरीराला इजा पोहोचून चेहरा विद्रुप होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.त्यामुळे बाजारातील केमिकल मिश्रित रंगांना तिलांजली देत स्वतः नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या रंगाने होळी आणि रंगपंचमीचा सण साजरा करण्यात यावा हा संदेश देण्यासाठी जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जवळपास चार किलो रंग तयार करून तो विद्यार्थ्यांना वाटप केला.
उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला विद्यार्थ्यांनी स्वतःहून प्रत्येकी पाच रुपये जमा करून बाजारातून मका पीठ, ज्वारी पीठ, हळदी, आवळा,केसर आणि कॉर्नफ्लॉवर पावडर या सर्व वस्तू विकत आणून त्यांच्यावर नैसर्गिक प्रक्रिया करून नैसर्गिक रंग तयार केले. कोणत्याही प्रकारचे केमिकल मिश्रण नसल्याने यापासून शरीराला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही.तसेच नैसर्गिक पद्धतीने होळी व रंगपंचमी सण उत्साहात साजरा करण्याची विद्यार्थ्यांनी यावेळी शपथ घेतली.यावेळी शाळेचे मु.अ.ईश्वर वाघ,उपक्रमशील शिक्षक रामदास कुलकर्णी , किरण धुळे ,श्रीमती रेखा हिवाळे ,श्रीमती कीर्ती कागबट्टे ,श्रीमती शारदा उगले ,रशिद तडवी ,माणिक राठोड आदींची उपस्थिती होती या उपक्रमाचे शाळेचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी,सचिव विजय देशमुख प्रा.राम भाले, विनायकराव देशपांडे, प्रा.केशरसिंह बगेरिया,डॉक्टर जुगलकिशोर भाला आदींनी स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले आहे.*