ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेलवर चालणाऱ्या (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या इलेक्ट्रिक गाडीचे लोकार्पण

देशात हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा उद्देश असलेला भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प

Image

नवी दिल्ली, १६ मार्च  /प्रतिनिधी :-जगातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान असलेल्या ग्रीन हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या गाडीचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नवी दिल्लीत लोकार्पण केले. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, आर के सिंह, महेंद्र नाथ पांडे, टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक मसाकाझू योशिमुरा, टिकेएम लिमिटेडचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते.

टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रा. लिमिटेड इंटरनॅशनल सेंटर फॉर ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी (आयसीएटी) सोबत जगातील सर्वात प्रगत फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेईकल (एफसीईव्ही) टोयोटा मिराई या हायड्रोजनवर चालणाऱ्या गाडीचा, भारतीय रस्ते आणि हवामान परिस्थितीशी सुसंगत अभ्यास आणि मूल्यमापन करण्यासाठी एक पथदर्शी प्रकल्प करत आहे.

देशात हरित हायड्रोजन आणि एफसीईव्ही तंत्रज्ञानाच्या अद्वितीय उपयुक्ततेबद्दल जागरूकता निर्माण करून, हरित हायड्रोजन आधारित परिसंस्था निर्माण करणे हा उद्देश असलेला भारतातील अशा प्रकारचा पहिला प्रकल्प आहे.

Image

जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करून स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणास प्रोत्साहन देणारा आणि त्याद्वारे भारताला 2047 पर्यंत ‘ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी’ बनवणारा हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.

फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (एफसीईव्ही), हायड्रोजनवर चालणाऱ्या सर्वोत्तम शून्य उत्सर्जन उपायांपैकी एक आहे.  हे पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. गाडीच्या टेलपाईपमधून( इंधनाचे ज्वलन झाल्यावर उत्सर्जन बाहेर सोडणारा पाईप) पाण्याशिवाय इतर कोणतेही उत्सर्जन यात होत नाही.

अक्षय ऊर्जा आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या बायोमासपासून हरित हायड्रोजन तयार केला जाऊ शकतो. हरित हायड्रोजनच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि अवलंब, भारतासाठी भविष्यात स्वच्छ आणि परवडणारी ऊर्जा सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.