चारठाण्याजवळ एसटी बसने तिघा तरुणांना चिरडले,तीन ठार

चारठाणा ,१३ मार्च  /एम. ए. माजीद :-जिंतूर – औरंगाबाद महामार्गावरील चारठाण्या पासुन एक किमी अंतरावर असलेल्या सिंगटाळा पाटी नजीक औरंगाबादहुन जिंतूरकडे जाणार्‍या एसटी बसने समोरून येणाऱ्या  तिघा जणांना बसखाली चिरडले. या मध्ये तीन तरूण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ७.३० च्या सुमारास घडली.

जिंतूर आगाराची औरंगाबादहुन जिंतूरकडे जात असलेली बस (क्रमांक एमएच १३ सी.यु.६९२१) व येलदरी येथून सेलूकडे जात असलेली दुचाकी (क्रमांक एमएच २१ ए.जे.६२५६) ही दोन वाहने सिगटाळा पाटीजवळ आली असता एसटी बसने दुचाकीला  जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील शेख अमीर शेख  नजीर  (वय १८ वर्ष), शेख मोबीन शेख नासेर (वय २२ वर्ष), अतीक रफीक टामटकरी (वय २० वर्ष सर्व रा. राजमोहल्ला सेलू जि.परभणी)   हे  तरूण जागीच ठार झाले. अपघातानंतर एसटी बस चालकाने एसटी बस जागेवर सोडुन पलायन केले.

या अपघाताची माहिती चारठाणा पोलिसांना मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोहेका गुलाब भिसे, आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. चारठाणा गावकऱ्यांनी यावेळी मदत कार्य केले. मृतांचे  शवविच्छेदन जिंतूर ग्रामीण रुग्णालयात करण्यात येणार असल्याचे समजते. अपघातापूर्वी याच बस चालकाने सोबत असलेल्या एका दुचाकीला कट मारल्याने दुचाकीवरील दोन तरूण  किरकोळरित्या जखमी झाले. नंतर हा अपघात झाल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.