बाळासाहेब, आपलेच सुपुत्र सत्तेसाठी आंधळे झालेत-देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारविरोधात घणाघात

Image

मुंबई ,९ मार्च / प्रतिनिधी :- भाजपाने राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढला. यावेळी विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दांत टीका केली.

Image

नवाब मलिक यांना जमीन खरेदी व्यवहार प्रकरणी ईडीकडून अटक झाल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यानंतर भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील याचे पडसाद उमटले. त्यांच्या राजीनाम्यासाठी आता भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

Image

आज आझाद मैदानात धडक मोर्चात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्यावरून ठाकरे सरकारविरोधात जोरदार निशाणा साधला. “जर अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला जातो, संजय राठोडांचा राजीनामा घेतला जातो, तर दाऊदच्या माणसाचा राजीनामा का नाही? कुणाच्या दाढ्या कुरवाळताय म्हणून तुम्ही राजीनामा घेत नाहीत?”, असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला आहे.

Image

“शरद पवार म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धव ठाकरे म्हणतात राजीनामा देऊ देणार नाही. उद्धवजी, तुमचं आमचं जमत नसेल, सोडून द्या. पण एक दिवस बाळासाहेब ठाकरेंना उत्तर द्यायचं आहे. तेव्हा तुम्हाला विचारलं जाईल, अशी व्यक्ती तुमच्यासोबत मंत्रिमंडळात होती. तेव्हा काय उत्तर द्याल? आम्ही तर बाळासाहेबांना सांगू, की नाही बाळासाहेब, आम्ही संघर्ष केला. पण काय करणार, आपलेच सुपुत्र मुख्यमंत्री होते. ते सत्तेसाठी एवढे आंधळे होते, की ते त्यांचा राजीनामा घेऊ शकले नाहीत. कारण त्यांना माहिती होतं, की राजीनामा घेतला, तर माझं सरकार जाईल”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Image

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवाय संघर्ष थांबणार नसल्याचं म्हटलं आहे. “हा देशद्रोह्याच्या विरोधात हा संघर्ष आहे. पाकिस्तानधार्जिण्या लोकांच्या विरोधात हा संघर्ष. जोपर्यंत बॉम्बस्फोटाचे आरोपी असलेल्यांसोबत व्यवहार करून जेलमध्ये गेलेल्या नवाब मलिकांचा राजीनामा घेत नाहीत, तोपर्यंत संघर्ष थांबणार नाही. आम्ही काही रोज राजीनामे मागत नाहीत. ही घटना राज्यासाठी लाजिरवाणी आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपाकडून नवाब मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आझाज मैदान ते मेट्रो सिनेमापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार अशा भाजपाच्या इतरही ज्येष्ठ नेत्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं.

दाऊदच्या दबावामुळे नवाब मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा नाही :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांचा गौप्यस्फोट

Displaying BJP3.JPG

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांना दाऊद इब्राहिमसाठी मनी लाँडरिंग केल्याच्या आरोपाखाली ईडीने अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली. त्यावेळी मलिक यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय झाला होता परंतु दाऊद इब्राहिमच्या दबावामुळे हा निर्णय मागे घेतला, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी मुंबईत भाजपाच्या मोर्चाला संबोधित करताना केला.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी संघर्ष करेल. गावोगावी, रस्तोरस्ती भाजपा निदर्शने करेल. दाऊदला संरक्षण देणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना फिरणे मुश्किल करू आणि हा संघर्ष यशापर्यंत नेऊ असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले की, पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर जनतेमध्ये संताप उसळल्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील महिना शंभर कोटीच्या वसुलीबाबत सीबीआय चौकशीचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर ताबडतोब देशमुख यांनी राजीनामा दिला. नवाब मलिक यांना न्यायालयाने ईडी कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर त्यांच्याही राजीनाम्याचा निर्णय आघाडीच्या प्रमुखांनी घेतला होता. पण नंतर दाऊदचा असा दबाव आला की राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यात आला. दाऊदच्या दबावाखाली काम करणाऱ्या सरकारला हटविण्यासाठी भाजपा रस्त्यावर उतरली आहे.

त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. त्यांची विजेची कनेक्शन कापली जात आहेत आणि पिके पाण्याअभावी जळत आहेत. पण दाऊदला संरक्षण देण्यासाठी आणि त्याला मदत करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी हे सरकार धडपडत आहे. त्यांना शेतकऱ्यांना नाही पण नवाब मलिक यांना वाचवायचे आहे. 

मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आमदारांची विधानभवनाच्या पाय-यांवर घोषणाबाजी

देशद्रोह्यांशी आर्थिक व्यवहार करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा देण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी विधीमंडळाच्या पाय-यांवर बुधवारी सकाळी १०.३० वाजता आंदोलन केले.

यावेळी भाजपच्या आमदारांनी ‘नवाब मलिक यांना पाठीशी घालणा-या सरकारचा धिक्कार असो’, महाराष्ट्राचे सरकार दाऊद समर्थक आहेत का?, नवाब मलिक यांचे त्यागपत्र घ्या, अन्यथा खुर्च्या खाली करा’, अशा आशयाच्या घोषणा दिल्या.आंदोलनाच्या वेळी भाजपच्या आमदारांनी नवाब मलिक आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या विरोधातील फलक हातात घेतले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप आमदार आशिष शेलार, आमदार श्वेता महाले, नमिता मुंदडा यांसह भाजपचे अन्य आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते.