‘उद्धव ठाकरे यांनी माझी कितीही चौकशी करावी’-सोमय्यांनी दिले आव्हान

मुंबई ,८ मार्च / प्रतिनिधी :- शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत केंद्रीय तपास यंत्रणा, भाजप आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती आरोप केले. या आरोपांना सोमय्या यांनी उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. आपण ज्या तक्रारी केल्या आहेत त्यांमध्ये तथ्य असल्यानेच त्यासंदर्भात कारवाई होत आली आहे. माझा राकेश वाधवान यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सोमय्या यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांना माझी कितीही चौकशी करावी, असे आव्हानच त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्याशी किरीट सोमय्या यांचे आर्थिक संबंध काय आहेत, हे त्यांनी स्पष्ट करावे असेही राऊत यांनी म्हटले आहे. पीएमसी बँक घोटाळा, राकेश वाधवान एचडीआयएल पत्राचाळ भ्रष्टाचार चांगली गोष्ट आहे. पण मी एक प्रश्न विचारला की राकेश वाधवान यांच्याशी संबंध काय आहे हा प्रश्न विचारला होता. वसईतील जमिनीबाबतही एक मुद्दा उपस्थित केला होता तेथे सोमय्यांची वाधवान यांची थेट भागीदारी आहे. यावर आपला वाधवान यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे.

संजय राऊत यांनी आमच्यावर कितीही आरोप केले असले तरी त्या संदर्भात त्यांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. किंवा त्यांनी आपल्या आरोपांबाबत कोणतीही कागदपत्रे दिलेली नाहीत, याकडे लक्ष वेधत सोमय्या यांनी राऊत करत असलेले आरोप निराधार असल्याचे सूचित केले आहे. ही त्यांची डायव्हर्जन टेक्निक असून अशा टेक्निकला आपण विचारत नाही. कितीही चौकशी करा, असे आवाहन किरीट सोमय्या यांनी केले आहे.

राऊत हे मला ईडीचा पाचवा एजंट म्हणत असले तरी ईडी असो, सीबीआय असो, उच्च न्यायालय असो वा, सर्वोच्च न्यायालय असो अशा सगळ्या ठिकाणी किरीट सोमय्या तक्रारी घेऊन जातात. तक्रारीत दम असतो म्हणून कारवाया केल्या जातात. न्यायालयात सोमय्या काही न्यायाधीश नाहीत. मी उद्धव ठाकरेंच्या १९ बंगल्याच्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले होते. मग मुख्यमंत्री ठाकरे हे १९ बंगल्यांवर बोलण्याची का हिंमत दाखवत नाहीत, असा सवालही सोमय्या यांनी केला आहे.