महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली,८ मार्च / प्रतिनिधी :-  देभभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करून सन्मान करण्यात आला. यामध्ये पुण्यातील डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगना  सायली अगावणे, बुलडाणा जिल्ह्यातील सर्पमित्र वनिता बोराडे आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील सामाजिक उद्योजिका कमल कुंभार या तीन महिलांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्रालयाच्यावतीने ‘नारीशक्ती पुरस्कार’ वितरण सोहळ्याचे आयोजन राष्ट्रपती भवन येथे करण्यात आले. या कार्यक्रमास केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती ईराणी, अन्य केंद्रीय मंत्रीगण तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी, डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगना सायली अगावणे, वनिता बोराडे या भारतातील पहिल्या महिला सर्पमित्र यांना वर्ष 2020साठी नारीशक्ती पुरस्काराने गौरविण्यात आले.  वर्ष 2021 साठी सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

डाऊन सिंड्रोमप्रभावित कथक नृत्यांगना सायली अगावणे

पुण्याची असणारी डाऊन सिंड्रोमप्रभावित सायली अगावणे ही प्रसिद्ध कथक नृत्यांगणा आहे. शारिरीक आणि बौद्धिक कमतरता असून देखील सायलीने कथक या भारतीय शास्त्रीय नृत्यात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. सायली हिने आतापर्यंत 1000 पेक्षा अधिक सार्वजनिक कार्यक्रम सादर केलेले आहेत. ग्लोबल ऑलंपियाड डान्स स्पर्धेत सायलीने कांस्यपदक जिंकलेले आहे. वर्ष 2012 मध्ये सायलीला केंद्रीय  सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते.  डाऊन सिंड्रोम आंतराराष्ट्रीय संस्था लंडन आणि स्कॉटलंड कडूनही तिला ‘विश्व डाउन सिंड्रोम दिवस पुरस्कार’ प्रदान करण्यात आलेला आहे.

प्रथम सर्पमित्र महिला वनिता जगदेव बोराडे

बुलडाणा जिल्ह्याच्या असणाऱ्या भारतातील  प्रथम सर्पमित्र महिला अशी वनिता जगदेव बोराडे यांची ओळख आहे. त्यांनी आतापर्यंत 51 हजारापेक्षा जास्त सापांना लोकवस्तीतून पकडून जंगलात, नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडल्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे.  वनचरे फाउंडेशन या संस्थेच्यामाध्यमातून वन्यजीव व साप यांच्याविषयी शिक्षण-प्रशिक्षण  कार्यशाळा त्या घेतात. सापांविषयी   शास्त्रीय रीतीने  जनजागरण तथा प्रबोधन करीत असतात.  भारत सरकाराच्या डाक विभागाने  त्यांच्या नावे  तिकिट काढून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

सामाजिक उद्योजिका कमल कुंभार

उस्मानाबाद जिल्ह्यातील  हिंगळजवाडी येथील सामाजिक उद्योजिका कमल कुंभार यांना त्यांच्या स्वयंरोजगारातील नवकल्पना आणि हजारो महिलांना प्रशिक्षित केल्याबद्दल त्यांना रोजगार उपलब्ध करून दिल्याबद्दल राष्ट्रपती यांच्या हस्ते वर्ष 2021 च्या नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीमती कुंभार यांनी 1998 मध्ये  कमल कुक्कुटपालन आणि एकता सखी प्रोड्यूसर कंपनी सुरू केली. ज्याअंतर्गत त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील  दुष्काळग्रस्त  भागातील जवळपास 3000 हजार महिलांना मदत केलेली आहे. श्रीमती कुभांर यांनी  प्रीमियम चिकन प्रजातीसाठी  एक पोल्ट्री ऑपरेशन स्थापित केले आहे.

यासह एसएसपी योजनेच्या स्वच्छ ऊर्जा कार्यक्रमामध्ये ऊर्जा सखीच्या रूपात प्रशिक्षण घेऊन हजारो महिलांही त्यांनी प्रशिक्ष‍ित  केलेले आहे. जवळपास 5000 महिलांना सुक्ष्म उद्योग सुरू करण्यात आतापर्यंत  त्यांनी मदत केलेली आहे.  त्यांना वर्ष 2017 मध्ये नीति आयोगाचा विमेन ट्रांसफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.