युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत सुखरूप परतले

युक्रेनमधून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या भारतीयांच्या पहिल्या तुकडीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले स्वागत

विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार

मुंबई ,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-एअर इंडियाचे AI – 1944 हे विशेष विमान (बुखारेस्ट- मुंबई)  युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप घेऊन आज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास दाखल झाले.

यावेळी विमानतळावर, केंद्रीय मंत्री पियूष गोयल, राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह विविध लोकप्रतिनीधी यांनी युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावास व राज्य शासनाचे मानले आभार मानले.

विद्यार्थ्यांना  आपापल्या राज्यात पाठविण्यासाठी मदत करण्यात येत होती. मुंबईत  परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पुणे, यवतमाळ, नागपुर, मुंबई अशा विविध भागातील विद्यार्थ्यांचा समावेश होता.

मुंबईत परतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सौरभ राठोड, करीना नोरोना, निलेश तिवारी, गौरव बावणे, अदनान खान, सनीला पाटील, अजय शर्मा आदी विद्यार्थ्याचा समावेश आहे.मुंबईत सुखरूप परतलेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून पहायला मिळाला. या विद्यार्थ्यांनी युक्रेनच्या युद्धजन्य परिस्थितीतून मायदेशी सुखरुप पोहोचवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य शासनाने केलेल्या मदतीबद्दल अभार व्यक्त केले.

युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने सर्वत्र अत्यंत भीतीदायक व दहशतीचे  वातावरण आहे. मात्र युक्रेनमधील भारतीय दूतावासाने केलेली मदत व महाराष्ट्र  शासनाची भक्कम साथ व संपर्कासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आज आम्ही मुंबईत सुखरूप परतलो आहोत, अशी प्रातिनिधिक प्रतिक्रिया नागपूर येथील विद्यार्थी गौरव बावणे यांनी दिली.

युक्रेनमध्ये परतलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना परत आणण्यासाठी राज्य शासनाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्याची माहिती जिल्हास्तरावर संकलित करण्याचे काम सुरु आहे.  सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी हेल्प लाईन क्रमांक जाहीर केले आहेत. तसेच राज्याचे नियंत्रण कक्ष 022- 22027990 या नंबरवर तसेच हॉटॲप क्र.9321587143 आणि [email protected]  या संपर्काचा राज्यातील विद्यार्थ्यांना फायदा झाला.

पहिल्या तुकडीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केले स्वागत

Image

युक्रेनमधून मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या पहिल्या तुकडीचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज स्वागत केले. आज संध्याकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचे AIC 1944 हे विमान पोहोचले. हे विमान, रोमानियाची राजधानी बुखारेस्ट च्या हेनरी कोएंदा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन, 219 प्रवाशांना घेऊन निघाले होते, या प्रवाशांमध्ये बहुतांश विद्यार्थी आहेत.

“युक्रेनमधून, मुंबईत सुखरूप परत आलेल्या या सर्व भारतीय बांधवांच्या चेहऱ्यावर हे हसू बघून खूप आनंद होत आहे,” अशी भावना पीयूष गोयल यांनी यावेळी व्यक्त केली.

तिथून परत आलेल्या सर्वांनी युक्रेनमधील आपल्या मित्रांशी संवाद कायम ठेवावा, असा सल्ला गोयल यांनी या प्रवाशांना दिला, तसेच, त्यांना काहीही काळजी न करण्याचे आवाहनही केले. सर्व नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकार मिशन मोडवर काम करत आहे, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षाशी चर्चा झाली आहे आणि त्या चर्चेत, तिथे असलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर त्यांनी भर दिला, असेही गोयल म्हणाले. सर्व भारतीयांची सुखरूप सुटका करण्यात मदत करण्याचे आश्वासन रशियानेही दिले आहे, असेही गोयल यांनी सांगितले.

Image

गोयल म्हणाले विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी आणखीही विमाने पाठवली जाणार आहेत, आणि दुसरे विमान रविवारी पहाटे दिल्लीत पोहोचण्याची शक्यता आहे.

गोयल यांनी देशाविषयी दाखवलेल्या समर्पणासाठी एअर इंडियाचे मनापासून आभार मानले. घरी परत येणाऱ्या प्रवाशांनी एअर इंडियाचे आभार मानले आहेत.