विलास साखर कारखान्यात एका दिवसात उच्चांकी १ लाख लिटर विक्रमी इथेनॉलचे उत्पादन
कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप सुरू
३५०० मे.टन गाळप क्षमता असताना ४३०० ते ४४०० मे.टन प्रती दिवस प्रमाणे ऊसाचे गाळप सुरू
सहवीजनिर्मिती प्रकल्प व आसवणी प्रकल्प कार्यक्षमतेने सुरू
वैशालीनगर-निवळी,२६ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- येथील विलास सहकारी साखर कारखान्याचे आसवणी प्रकल्पात दिनांक २५ फेब्रुवारी रोजी एका दिवसात उच्चांकी १ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. एका दिवसात उच्चांकी इथेनॉल उत्पादन झाल्याबददल कारखान्याचे संस्थापक अमित विलासराव देशमुख यांनी कारखान्याचे सभासद, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, कामगार व तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे अभिनंदन केले आहे.
विलास कारखान्याचे चालू गळीत हंगामाकरीता इथेनॉल उत्पादन प्रकल्पाची क्षमता ९० हजार प्रती दिन प्रमाणे विस्तारीकरण केले असून दिनांक २५ फेब्रुवारी रोजी एका दिवसात १ लाख लिटर उत्पादन करून विक्रम प्रस्थापीत केला आहे. केंद्र शासनाचे इथेनॉल उत्पादनाकरिता असणारे प्रोत्साहन व ऑईल कंपन्यांची इथेनॉलकरिता असणारी मागणीचा विचार करता व साखरेचे देशात वाढणारे उत्पादन, त्यामुळे साखरेचे दरात होणारी घट इत्यादीचा विचार करून कारखान्याचे संस्थापक तथा महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व संस्थेच्या चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वात संचालक मंडळाने इथेनॉल उत्पादन प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेऊन कमीत कमी खर्चात व अल्पावधीत विस्तारीकरण करून वाढीव क्षमतेप्रमाणे उत्पादन देखील सुरू केले आहे. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी उच्चांकी १ लाख लिटर उत्पादन झाले असून आज अखेर ४० लाख ७८ हजार २७६ लिटर इथेनॉल उत्पादन झाले आहे. उत्पादित इथेनॉलपैकी ३९ लाख ८१ हजार ०२२ लिटर इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा करण्यात आलेला आहे.
विलास सहकारी साखर कारखान्याचा चालु गळीत हंगाम माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख व संस्थापक अमित विलासराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली, चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख,लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांचे नेतृत्त्वाखाली व संचालक मंडळाच्या प्रयत्नाने यशस्वीपणे सुरू आहे. चालु गळीत हंगामात कारखान्याने दिनांक २५/०२/२०२२ अखेर उच्चांकी साखर उताऱ्याने ४,०९,०९० मे.टन ऊसाचे गाळप पुर्ण केले आहे. कारखान्याची दैनिक गाळप क्षमता ३५०० मे.टन प्रती दिन असताना कारखाना जास्तीत जास्त कार्यक्षमतेने चालवून सध्या ४३०० ते ४४०० मे.टन प्रती दिन ऊसाचे गाळप सुरू आहे. गाळपास आलेल्या ऊसास रू.२२००/- प्रती मे.टन प्रमाणे ऊस दरापोटी ॲडव्हान्स अदा करण्यात येत आहे. सहवीजनिर्मिती प्रकल्प पुर्ण क्षमतेने सुरू असून चालू गळीत हंगामात २ कोटी ९४ लाख ६१ हजार ६०० युनीट वीज निर्मिती झाली असून १ कोटी ६० लाख ४८ हजार २०० युनीट वीज निर्यात झालेली आहे.
कारखाना स्थळावर झेडएलडी (झीरो लिक्वीड डीस्चार्ज) प्रकल्पांतर्गत २२ टीपीएच इन्सिनरेशन बॉयलर, २ मे.वॅट टर्बाईन, सीपीयू व मल्टीप्रेशर स्पेंटवॉश इव्हॅपोरेशर प्लॅन्ट उभारणीचे काम अंतिम टप्यात असुन लवकरच सदरील प्रकल्पाचे उदघाटन कारखान्याचे संस्थापक नामदार अमित विलासराव देशमुख यांचे शुभहस्ते होणार आहे.
कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, ऊस तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा,कार्यकारी संचालक , अधिकारी,कर्मचारी,कामगार व संचालक मंडळ यांचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. चालू गळीत हंगामात कार्यक्षेत्रातील ऊसाचे प्राधान्याने गाळप करण्यात येत असून उपलब्ध संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे नियोजन कारखाना व्यवस्थापनाने केले असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.