औरंगाबादमध्ये तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

वाळूज (जि.औरंगाबाद),२१ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शरणापूर येथून जवळ असलेल्या भांगसी माता गड परिसरात सोमवारी उघडकीस आली.

Three Boys Drowned In Farm Pond In Aurangabad

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाच्या मदतीने मृत मुलांना पाण्याबाहेर काढले. वाळूज परिसरातील सारा संगम सोसायटी बजाजनगर येथील प्रतिक आनंद भिसे (वय १५), तिरुपती मारुती कुदळकर (वय १७) व शिवराज संजय पवार (वय १६) हे तीन जण बजाजनगर येथून रविवारी (ता.वीस) दुपारी दीडच्या सुमारास भांगसी माता गडाकडे सायकल वरून फिरण्यासाठी गेले होते. गडाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या शरणापूर गट न ८/४ मधील नारायण वाघमारे यांच्या शेकापुर शिवार शेतातील शेततळ्यात पाणी बघून त्यांना पोहण्याचा मोह आवरला नाही.