कोरोना ससंर्गाला रोखण्यासाठी महिला अधिकारी आघाडीवर

औरंगाबाद दि.12:- शहरात लाॅकडाउनची अमंलबजावणी प्रभावीपणे होण्यासाठी प्रशासनामार्फत निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या निरीक्षकांमध्ये महसूल विभागाच्या सहा महिला उपजिल्हाधिकारींचाही समावेश आहे. सध्याच्या कोरोना संसर्गाच्या संकटात या महिला अधिकारी उत्स्फूर्तपणे प्रत्यक्ष मैदानात उतरून आपली जबाबदारी आणि कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत.

जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलिस यंत्रणा यासह अनेकजण दिवसरात्र आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. या सर्वांसोबत उपजिल्हाधिकारी रिता मेत्रेवार,सरिता सुत्रावे,अंजली धानोरकर, संगीता सानप, वर्षाराणी भोसले व संगीता चव्हाण या सहा उपजिल्हाधिकारी देखील हिरीरीने औरंगाबाद शहरातील विविध भागात फिरुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध प्रकारच्या जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच लाॅकडाऊनचे पालन व्यवस्थित होत आहे का याची पहाणी करत आहेत.

रिता मेत्रेवार

जनतेला लाॅकडाऊनचे यशस्वी पालन करण्याचे आवाहन करणे, जनजागृती करणे , त्यांच्या समस्या, अडचणी समजून घेणे, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे अशा विविध पातळ्यांवर या सर्व महिला अधिकारी व्यापकपणे काम करत आहेत. तसेच कंटेनमेंट क्षेत्रात जनतेला जीवनावश्यक वस्तू लागत असतील तर त्या पुरविण्याबाबत संबंधिताना सूचना देणे , लोक विनाकारण बाहेर पडत नाहीत ना ,तसेच लाॅकडाऊन मुळे लोकांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होण्यात काही अडचण तर येत नाही ना ,कन्टेनमेंट झोनला प्रत्यक्ष भेट देवून नागरीकांना घरीच राहण्याने आवाहन करण्याची जबाबदारी या महिला अधिकारी यशस्वीपणे पार पाडत आहेत.

अंजली धानोरकर

त्यासोबतच क्वारंटाइन कक्षांमध्ये लोकांना व्यवस्थित सोयी-सुविधा उपलब्ध आहेत का, काही अडचण आल्यास ती सोडवण्यासाठी संबंधितांना सूचना देऊन त्या समस्या तातडीने दूर करण्यासाठी सर्व निरिक्षक कटाक्षाने देखरेख ठेवत आहेत.त्यासोबतच या महिला अधिकारी अनेक ठिकानी स्वत: वाहन अडवून तपासणी करणे , नियुक्त ठिकाणी कर्मचारी व्यवस्थित काम करत आहेत काय ,त्यांना काही अडचणी आहेत काय , त्या सोडविण्यासाठी ही प्रयत्नशील आहेत.

त्याचप्रमाणे प्रत्यक्ष कोविड केअर सेंटर मध्ये जावून या महिला अधिकारी रुग्णांची भेट घेऊन, त्यांच्या काही अडचणी असतील तर त्या जाणून घेतात . समस्या सोडविण्यासाठी तसेच रुग्णाना धीर देऊन लवकर बरे होण्यासाठी प्रोत्साहन देण्यात ही या आघाडीवर आहेत.

तसेच या लाॅकडाऊनमध्ये पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या मदतीने रुग्णास दवाखान्यात पोहचवण्यासाठी अधिकारी आवश्यक सहकार्य करत आहे.

सरिता सुत्रावे

या आरोग्य आपत्तीच्या काळात आपल्या प्रत्येकाची भूमिका महत्त्वाची आहे.आपल्या जबाबदारीची जाणीव ठेऊन आपापल्या परीने प्रत्येकाने या लढाईत शंभर टक्के योगदान दिले तर निश्चितच आपण ही लढाई जिंकू हा संदेश आपल्या कामातून देणाऱ्या या महिला अधिकारींच्या कामाचे जनतेकडून, सहकाऱ्यांकडूनही स्वागत होत आहे.

त्यासोबतच त्यांच्या कामातून इतरांना ही या महामारीच्या संकट काळात स्वत:होवून पुढे येवून काम करण्याची सकारात्मक प्रेरणा मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *