एनसीसी छात्रांनी दूत बनून सूर्यनमस्कार व योगाबाबत जनजागृती करावी-ब्रिगेडियर मंगेश विटेकर
सूर्यनमस्कार महायज्ञात हजारांवर कॅडेट्सचा सहभाग
औरंगाबाद,१७ फेब्रुवारी / प्रतिनिधी :- एनसीसी छात्रांनी दूत बनून सूर्यनमस्कार, योगासनांबाबत समाजात जनजागृती करावी, आणि सर्वांना व्यायामासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन राष्ट्रीय छात्र सेना, औरंगाबाद विभागाचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर मंगेश विटेकर यांनी केले. देशभर सुरू असलेल्या 75 कोटी सूर्यनमस्कार महायज्ञामध्ये एनसीसी कॅडेटसाठी क्रीडा भारतीच्या पुढाकाराने विभागीय क्रीडा संकुल सामूहिक सूर्यनमस्काराचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. या सूर्यनमस्कार महायज्ञ कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या सेवानिवृत्त आयएएस अधिकारी पुरूषोत्तम भापकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय खेल प्राधिकरणाचे सीईओ तथा उपसंचालक नितीनकुमार जैस्वाल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सहकार्यवाह धनंजय धामणे, जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे, क्रीडा भारतीचे अध्यक्ष पंकज भारसाखळे यांची उपस्थिती होती. शहरातील सतरा महाविद्यालयातील 1000 हून अधिक एनसीसी छात्रांनी एकत्र येऊन सूर्यनमस्कार केले.
ब्रिगेडियर मंगेश विटेकर म्हणाले की, सर्वच बाबतीत सूर्यनमस्कार सोपा आणि शरीरास उपयुक्त व्यायाम आहे. समाजात व्यायाम आणि आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी एनसीसी कॅडेट्सनी दूत बनावे आणि सर्वांना सूर्यनमस्कारांसाठी प्रोत्साहित करावे असे आवाहन त्यांनी केले.
माजी आएएसएस अधिकारी पुरूषोत्तम भापकर यांनी समाजात आरोग्याबाबत जनजागृतीसाठी अशा कार्यक्रमांची गरज असल्याचे सांगितले. भारतीय संस्कृतीने जगात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. देशभरात सुरू असलेल्या 75 कोटी सूर्यनमस्कार मोहिमेने केव्हाच 75 कोटींचा टप्पा गाठला असून या माध्यमातून देशभरात योगसाधनेची चळवळ सुरू झाल्याचे ते म्हणाले.
सूर्यनमस्कार महायज्ञात शहरातील सतरा महाविद्यालयांतील 1000 हून अधिक एनसीसी छात्रांनी एकत्र येत सूर्यनमस्कारांचे सादरीकरण केले. तसेच योग संघटनेच्या योगसाधकांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. तसेच व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी सूर्यनमस्कार प्रात्यक्षिकात सहभाग नोंदवला.
75 कोटी सूर्यनमस्कार संकल्प समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. उत्तम काळवणे यांच्या मार्गदर्शनाखाली , उदय कहाळेकर, विनायक राऊत, पद्मा धरवाडकर. प्रमिला आव्हाळे व समिती सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला तर क्रीडा भारतीचे डॉ. संदीप जगताप यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार व्यक्त केले.