भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई,१२ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राहुल  बजाज यांनी दुचाकी वाहनांच्या उत्पादनात देशात क्रांती आणली तसेच जगातील या क्षेत्रातील इतर कंपन्यांसमोर भारताचे आव्हान उभे केले. त्यांनी केवळ आपल्या उद्योगाचा विकास असा संकुचित विचार केला नाही तर देशातील सर्वच उद्योगांच्या समस्या आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर स्पष्ट व निग्रही भूमिका घेतली. एक सच्चा देशभक्त उद्योजक म्हणून देशासमोरील काही समस्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आणि जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे सामाजिक कार्यही उद्योजकांनी सामाजिक जबाबदारी कशी पार पाडावी त्याचे उत्तम उदाहरण होते.

राहुल  बजाज हे विशेषत: उद्योजकांच्या युवा पिढीचे मार्गदर्शक होते. त्यांनी राज्य शासनाला देखील उद्योगाच्या विकासासंदर्भात वेळोवेळी महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत.

त्यांच्या जाण्याने निश्चितच राज्याच्या उद्योग विश्वाचे नुकसान झाले आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आपल्या श्रद्धांजलीपर संदेशात म्हणतात.

राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुःख व्यक्त केले आहे.

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात तसेच देशाच्या औद्योगिक आणि सामाजिक विकासात बजाज घराण्याचे आणि बजाज उद्योग समूहाचे योगदान फार मोठे आहे. बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळात बजाज उद्योग समूहाचा देशात तसेच बाहेर मोठा विस्तार केला.

उद्योगाला आधुनिक व्यवस्थापन तंत्राची जोड देताना त्यांनी ‘बजाज’ हे ब्रँड नाव सर्वतोमुखी केले. देशाच्या उद्योग विश्वासमोरील समस्यांबद्दल आपली मते ते परखडपणे मांडत.

महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात तसेच रोजगार निर्मितीत बजाज समूहाचे योगदान मोठे आहे. सामाजिक दायित्वाच्या बाबतीत देखील त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.  राहुल बजाज यांच्या निधनामुळे देशाने आणि विशेषतः महाराष्ट्राने एक द्रष्टे औद्योगिक नेतृत्व गमावले आहे.

श्री. बजाज यांना श्रद्धांजली अर्पण करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय तसेच बजाज परिवाराला कळवतो असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग क्षेत्रातील पितामह हरपला – उपमुख्यमंत्री अजित पवार

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष पद्मभूषण राहुल बजाज यांच्या निधनाने सामाजिक भान असलेला भारतीय उद्योग जगतातील पितामह हरपला आहे. बजाज कंपनीच्या माध्यमातून भारताला ऑटो उद्योगात स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांचे निधन हे भारतीय सामाजिक, उद्योग क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, गेल्या पाच दशकांमध्ये बजाज समूहाला नावारुपाला आणण्यात राहुल बजाज यांनी प्रचंड योगदान दिले. त्यांचा प्रदीर्घ अनुभव, ज्ञान, दूरदृष्टीचा बजाज उद्योगासह भारतीय ऑटो उद्योगाच्या विकासात मोलाचा वाटा राहिला आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात बजाज कंपनीमुळे भारताला स्वतंत्र ओळख मिळाली. स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. उद्योग क्षेत्रात कार्यरत असूनही राहुल बजाज यांनी आयुष्यभर सामाजिक भान जपले. त्यांच्या दातृत्वाच्या गुणामुळे अनेक सामाजिक संस्थांशी त्यांचे निकटचे संबंध राहिले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी झाली असून भारताने एक महान सुपुत्र गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्योगपती राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे – उद्योगमंत्री सुभाष देसाई

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे. अशा शब्दात उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

श्री देसाई आपल्या शोक संदेशात म्हणतात, राहुल बजाज यांना महाराष्ट्राचे उद्योगमहर्षिच म्हटले पाहिजे. त्यांनी केलेला उद्योग विस्तार सर्वांना अचंबित करणारा आहे. स्व. कमलनयन बजाज यांनी सुरू केलेल्या या उद्योगाच्या गंगोत्रीचे राहुल बजाज यांनी आपल्या कार्यकाळामध्ये मोठ्या गंगेत परिवर्तन केले. त्यांनी त्यांच्या उद्योगाचा विस्तार करताना अनेक लघुउद्योजकांची निर्मिती केली. त्यांचे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मैत्रीचे संबंध होते. राहुल बजाज यांनी त्यांच्या उद्योगाचा जास्तीत जास्त विस्तार महाराष्ट्रात केला याबद्दल खरोखरच त्यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या निधनाने उद्योगजगताची कधीही भरून न निघणारी हानी झाली आहे.  त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची श्रद्धांजली

बजाज उद्योग समूहाचे सर्वेसर्वां ज्येष्ठ उद्योगपती ज्येष्ठ उद्योगपती पद्मभूषण राहुल बजाज यांचे निधन दुःखदायक आहे. पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी भारतीय उद्यमी जगतावर आपला प्रभाव टाकला. भारतीय सर्वसामान्य माणूस व मध्यमवर्गीय कुटुंबाचे परवडणाऱ्या सुखद प्रवासाचे स्वप्न राहुल बजाज यांनीच सर्वप्रथम प्रत्यक्षरूपात आणलं. अशा शब्दात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय प्रवासी संकल्पनेत तसेच तरुण उद्योजकांमध्येही ‘हमारा बजाज’ हे अविभाज्य अंग म्हणून समोरे आले. बजाज कुटुंबीयांप्रति सहसंवेदना व्यक्त करतो. राहुल बजाज यांना भावपूर्ण श्रद्धांजली! असेही श्री वळसे पाटील यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.

भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्व हरपले – जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची राहुल बजाज यांना आदरांजली

बजाज उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनामुळे भारतीय औद्योगिक विकासाला गती देणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे अशा शोकभावना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज व्यक्त केल्या आहेत.

श्री. पाटील यांनी शोकसंदेशात नमूद केले आहे की, भारतीय औद्योगिक विश्वाला विशेषतः ऑटो उद्योगाला स्वतंत्र ओळख निर्माण करुन देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि औरंगाबाद येथील उद्योग विश्वाची भरभराट करण्यात आणि या शहरांच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी विकसित केलेल्या अनेक वाहनांमुळे सामान्य माणसांच्या आशा आकांक्षां पूर्णत्वास गेल्या.

भारताला स्वयंचलित दुचाकी वाहन उद्योग क्षेत्राला नव्वदच्या दशकात स्वतंत्र ओळख मिळाली. यामध्ये राहुल बजाज यांच्या नेतृत्वाखालील बजाज कंपनीचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जमनालाल बजाज यांचा देश सेवेचा वारसा जपला. त्यांनी समाजातील दुर्बल वर्गासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदतीचा हात देऊन सामाजिक भान जोपासले, असे श्री. पाटील यांनी संदेशात नमूद केले आहे.