सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबवा- उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वच्छ शाळा – सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरण

सोलापूर,८ फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  सोलापूर जिल्हा परिषदेचा स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राज्यात राबविण्याचे आवाहन उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आज स्वच्छ शाळा – सुंदर शाळा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात मार्गदर्शन करताना ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार, शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, विभागीय आयुक्त सौरभ राव प्रमुख उपस्थित होते. तर सोलापुरातून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरूध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, जिल्हा पशु संवर्धन विभागाचे सभापती अनिल मोटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उपशिक्षणाधिकारी संजय जावीर प्रमुख, विरोधी पक्षनेते बळीराम साठे, जिप सदस्य वसंतराव देशमुख, भारत आबा शिंदे उपस्थित होते.

 उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, कोरोना काळात सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चांगले काम केले आहे. माझे गाव कोरोनामुक्त गाव याबरोबरच त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रम कोरोना काळात राबवून लोकवर्गणीतून सात लाख रूपयांचे साहित्य जमा केले. यातूनच शाळा स्वच्छ व सुंदर केल्या आहेत. हा उपक्रम राज्यस्तरावर राबविणेच्या सुचना करताना पुणे विभागात सर्वप्रथम यांची अंमलबजावणी करणेच्या सूचनाही त्यांनी दिल्या. या उपक्रमांत सातत्य ठेवा, असे सांगून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे कौतुक केले. त्यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असताना विविध उपक्रम राबविले होते. आज  तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांची आठवण होत असल्याचे सांगून त्यांनी ग्रामविकासासाठी अशा पध्दतीने विविध उपक्रम लोकसहभागातून राबविले होते.

 श्री. स्वामी यांच्या पारावरची शाळा, पर्यावरण संतुलनासाठी माझी वसुंधरा उपक्रम, माझे मुल माझे अभियान, माझे गाव कोरोनामुक्त गाव उपक्रमाची दखल राज्य स्तरावर घेऊन त्याचा शासन निर्णय काढणेत आला. अशा उपक्रमाची आज आवश्यकता असल्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मी शाळा पाहणार – उप मुख्यमंत्री अजित पवार

ऑनलाईन कार्यक्रमाने पुरस्कार वितरण करण्यात आले असले तरी ज्या 2764 शाळेमध्ये स्वच्छतेचे काम केले आहे ते काम महत्वपूर्ण आहे. सात कोटी रूपये जमा करणे येड्यागबाळ्याचे काम नाही, खरी मेहनत घेतली आहे. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यात जाईन त्याचवेळी शाळा पाहून तेथील शिक्षकांचा गौरव, करेन असेही श्री. पवार म्हणाले.

पालकमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेने विविध अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्याची मान राज्यात उंचावली आहे. माळशिरस तालुक्यांतील कारूंडे शाळेचा गौरव करून एका दिवसात 41 लाख रूपये ग्रामस्थांनी जमा करून या अभियानाचे महत्व अधोरेखीत केले.

जिल्हाधिकारी श्री. शंभरकर म्हणाले, श्री. स्वामी यांनी स्वच्छ सुंदर शाळामध्ये मोठे काम केले आहे. आपला सर्वाधिक वेळ त्यांनी या अभियानासाठी देऊन अभियान यशस्वी केले आहे. त्यांच्या विविध अभियानामुळे विविध विकास कामांना मदत झाली.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी स्वच्छ सुंदर शाळा उपक्रमाचे कौतुक केले. सीईओ स्वामी व त्यांच्या टीमने घेतलेले परिश्रम या मुख्याध्यापकांच्या चेहऱ्यावरील आनंदामुळे दिसून येत आहे. बालकांना मोकळा श्वास घेता येत आहे. खूप छान काम शाळांचे झाले आहे.

अध्यक्ष श्री. कांबळे यांनी कर्मचारी व अधिकारी यांनी चांगले काम केल्याबद्दल गौरव केला.

गटविकास अधिकारी देसाई यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन गुरव यांनी केले. यावेळी विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, त्रिमुर्ती राऊत, श्रीधर कलशेट्टी, आब्बास शेख, राचेट्टी यांचा गौरव करण्यात आला. मुंबई येथे पाच शाळांचे मुख्याध्यापक यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर जिल्हास्तरावर 39 शाळांचा गौरव करण्यात आला.

मला सर्व कर्मचाऱ्यांचा अभिमान – दिलीप स्वामी

जिल्हा परिषदेमध्ये काम करणारे सर्व शिक्षक व कर्मचारी यांच्याबरोबरच ग्रामसेवक यांनी देखील स्वच्छ सुंदर शाळेसाठी योगदान दिले आहे. माझे अधिकारी व कर्मचारी यांचा मला अभिमान असल्याचे सांगितले. 9 लाख बालकांची तपासणी, माझे गाव कोरोनामुक्त गाव व विविध अभियानाने मला समाधान दिले. मी या जिल्ह्यातला नाही पण जिल्ह्याची सेवा करताना कर्मचारी व पदाधिकार यांनी दिलेले योगदान विसरणार नाही.