राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात, मार्च महिन्यात तिसरी लाट संपणार-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना : कोरोनासंसर्गाचा फैलाव आणि राज्यातील मृत्यूदरामध्ये घट झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आल्याने निर्बंधांमध्येही सूट देण्यात आली आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट कधी ओसरणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्यात तिसरी लाट ओसरणार असल्याची महत्त्वाची माहिती दिली. जालन्यात ते प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलत होते.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ओमायक्रॉन विषाणूच्या संसर्गाचा फैलावामुळं राज्याची चिंता वाढली होती. मात्र, लसीकरण आणि आरोग्य विभागाच्या उपाययोजनामुळं परिस्थिती नियंत्रणात होती. नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात रुग्णसंख्येमध्येही घट दिसून आली. यंदा जानेवारी महिन्यामध्ये मृत्यूदरामध्ये घट झाली आहे. यामुळं राजेश टोपे यांनी निर्बंधांबाबत माहिती दिली.

सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध टप्प्या-टप्प्याने कमी होत आहेत. दर आठवड्याला आता निर्बंध कमी होत असल्याचं यापुढे पाहायला मिळेल, असंही टोपे म्हणाले. मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत आपण तिसऱ्या लाटेच्या शेवटाकडे जाऊ असं तज्ञांच्या मतावरून आपल्याला वाटत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.