औरंगाबाद ग्रामीण भागातील पहिली पासूनच्या शाळा 1 तारखेपासून पूर्णपणे सुरू

लसीकरण कमी असणाऱ्या भागातील डॉक्टरांवर होणार कारवाई-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

Displaying DSC_5652.JPG

औरंगाबाद,३१ जानेवारी / प्रतिनिधी :- औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आला होता अशा रुग्णांची ‘केस स्टडी’  करण्यासाठी अभ्यास गटाची नियुक्ती करावी तसेच ओमायक्रॉनपासून बचाव करण्यासाठी पात्र नागरिकांना लसीकरण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

          जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, उपजिल्हाधिकारी मंदार वैद्य, अप्पासाहेब शिंदे, पोलिस उपायुक्त उज्वला बनकर, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. सुधाकर शेळके,  तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Displaying DSC_5638.JPG

           जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कोविड रुग्णांची संख्या कमी कमी होत असल्याने ग्रामीण भागातील पहिलीपासूनच्या शाळा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहेत. कोविड रुग्ण कमी होत असले तरी लसीकरण पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या भागातील लसीकरण कमी आहे त्या भागातील डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करून गुन्हे देखील दाखल करण्यात येतील. ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’ अंतर्गत ज्या भागात लसीकरण कमी आहे त्या भागात हे वाहन नेण्यात यावे. ज्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर लावण्यात आला होता अशा रुग्णांची ‘केस स्टडी’ करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करण्यात यावी. हा गट अशा रुग्णांपैकी किती रुग्णांनी पहिला, दुसरा डोस घेतला होता तसेच किती रुग्णांनी एकही डोस घेतला नाही अशा रुग्णांचा अभ्यास करेल असेही जिल्हाधिकारी म्हणाले.