बाळासाहेब ठाकरे स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करावे-पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद दि. 09 :- प्रियदर्शनी उद्यान एम.जी.एम. एन-6 परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिके अंतर्गत विविध कामांचा आढावा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. यावेळी बैठकीत महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. संजय सिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, जिल्हाधिकारी उदय चौधरी, महानगरपालिका आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय, अतिरिक्त आयुक्त  रवींद्र निकम, शहर अभियंता एस. डी. पानझडे, मुख्य लेखाधिकारी संजय पवार, आरोग्य  अधिकारी डॉ. नीता पाडळकर, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, सहाय्यक आयुक्त सुमंत मोरे, उद्यान अधीक्षक विजय पाटील, स्मार्ट सिटी उपव्यवस्थापक पुष्कल शिवम व इतर अधिकारी यांची उपस्थिती होती.

            यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई म्हणाले की,  प्रियदर्शनी उद्यान एम.जी.एम. एन-6 परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक व स्मृतीवनाच्या कामासंदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी विनाविलंब दूर करून काम तातडीने पूर्ण करावे. तसेच मुख्यमंत्री शहरी सडक योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या स्वनिधीतून रस्त्याची कामे या महिन्याच्या अखेरीस पुर्ण होणार असून. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यासंदर्भात एका आठवड्यात कामाची निविदा काढणार असल्याची माहिती श्री. देसाई यांनी यावेळी दिली.

            यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त आस्तिक कुमार पाण्डेय यांनी शहरातील विविध कामांसंदर्भात माहिती देताना म्हणाले की, शहरातील स्मार्ट सिटी बस योजना ही यशस्वी झाली असून प्रत्येक वर्षी 100 याप्रमाणे पुढील पाच वर्षासाठी सुमारे पाचशे बसचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शहरात 27 मार्गावर 100 बस धावत आहे. शहरात 1 बस डेपो उभारण्यात आला आहे, तर दुसऱ्या टप्यात किमान तीन बस डेपो कार्यान्वीत करण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तसेच शहरातील नऊ ऐतिहासिक दरवाज्यांची दुरूस्ती लवकरच करण्यात येणार असून शहरातील तीन पुलांच्या कामाकरीता डीपीडीसीतून मान्यता देण्यात आली आहे. पॅनसिटी अंतर्गत मनपाच्या शाळा, दवाखाने, कार्यालय ई-गव्हर्नस प्रकल्पात घेण्यात येणार आहेत. मास्टर सिस्टीम ईन्टफ्रीग्रेटर अंतर्गत शहरात सीसीटीव्ही बसविणे, पोलीस संरक्षण, बायोमॅट्रीक प्रणालीचा समावेश असून मनपाच्या सर्व कार्यालयात इंटरनेटसाठी फायबर ऑप्टीकल्स टाकण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ उद्यान हे शहराच्या मध्यभागात येत असल्याने प्राणीसंग्रहालया करीता तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे मिटमिटा येथे 100 एकर जागा उपलब्ध करण्यात आली असून येथेच प्राणीसंग्रहालय उभारण्यात येऊन पुढील टप्यात सफारी पार्कसाठी अतिरिक्त जागेकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या प्रकल्पातून महानगरपालिकेला 10 ते 15 कोटी वार्षीक उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. घनकचरा व्यवस्थापन या विषयी माहिती देतांना श्री. पाण्डेय म्हणाले की, शहरात दोन ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्राव्दारे कचऱ्यावर प्रक्रिया करणे चालू असून लवकरच हर्सुल येथील प्रक्रिया केंद्रही चालू करण्यात येऊन कचऱ्यापासून बायोमिथेन गॅस हा प्रकल्प देखील चालू करण्यात येणार आहे.

समांतर पाणी पुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील अतिरिक्त पाणी टँकरव्दारे शहराला उपलब्ध करून देण्यात येत आहे. लवकरच स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात येणार असल्याने संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न मिटणार आहे. पंतप्रधान आवास योजने अंतर्गत 10 हजारपेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील 600 घरांकसाठी डीपीआरमध्ये घेण्याकरीता गती देणे आवश्यक असल्याचे सांगून श्री. पाण्डेय म्हणाले की, 90 टक्के लोकांकडे जुने कागदपत्र उपलब्ध नसल्याने घराची पुर्तता करण्यास अडचणी येत आहेत. याकरीता परवडणाऱ्या घरकुल योजनेसाठी अर्ज मागविण्यात आले असून याकरीता तीसगाव येथील जमीन उपलब्धतेसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. यावेळी बैठकीत समांतर पाणी पुरवठा योजना, घनकचरा व्यस्थापन, स्मार्ट सिटी, प्रधानमंत्री आवास योजना, सफारी पार्क, शिक्षण, केंद्रशासन पुरस्कृत अमृत योजना, शहर सुशोभिकरण आदी विषयांवर या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *