जायकवाडीच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने व्हावे – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई,२१ जानेवारी / प्रतिनिधी :- गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जायकवाडी धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे, अशी संकल्पना राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मांडली.

मंत्रालय येथे आज कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ तसेच गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या बैठक झाल्या. त्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या.

जायकवाडी हे गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत येणारे सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या कालव्यांचे व्यवस्थापन अत्याधुनिक पद्धतीने व्हायला हवे. दरवाजे सेंट्रलाईज पद्धतीने उघडावे, पाण्याची चोरी झाली तर त्याची तात्काळ माहिती मिळावी अशा सर्व व्यवस्था असायला हव्या, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

परभणी, नांदेड भागात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. अनेक ठिकाणी पाणी पोहोचत नाही. या भागातील कानाकोपऱ्यात पाणी पोहोचवायचे असेल तर ही व्यवस्था करावीच लागेल. या संकल्पनेबाबत जागतिक पातळीवर अभ्यास केला जावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

या बैठकीत महामंडळांतर्गत येणाऱ्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला गेला. तसेच विविध प्रकल्पांत येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आली. जलसंपदा प्रकल्प गतीने पूर्ण करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना श्री. पाटील यांनी दिल्या. या प्रश्नांची सोडवणूक करून या भागातील सिंचन क्षमता वाढवण्याचा प्रयत्न येत्या काळात केली जाईल, असेही जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.