सोमवारपासून लातूर जिल्ह्यात शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे:पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे निर्देश

लातूर,२१ जानेवारी / प्रतिनिधी :- कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेल्या शाळा- कनिष्ठ महाविद्यालय सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या अनुषंगाने शिक्षणाचे माहेरघर असलेल्या लातूर जिल्ह्यात सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून विद्यार्थ्यांची काळजी घेत शैक्षणिक उपक्रम सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी करावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासन व संबंधित विभागांना दिले आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यानंतर दक्षतेचा उपाय म्हणून राज्यातील शाळा कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, या तिसऱ्या लाटेत प्रादुर्भाव झपाट्याने वाढला, मात्र या प्रादुर्भावाचे परिणाम सौम्य असल्याचे लक्षात आल्याने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य स्तरावरून घेण्यात आला आहे, प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन तेथील प्रशासनाने याबाबत निर्णय घ्यावेत असे सांगण्यात आलेले आहे.

लातूर जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत आणखी वाढ कायम आहे, मात्र या प्रादुर्भावाची लक्षणे सौम्य आहेत आणि त्यातून फारसा धोका नसल्याचे लक्षात आले आहे, एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेता शैक्षणिक दृष्ट्या जागरूक आणि दक्ष असलेल्या या जिल्ह्यात शैक्षणिक व्यवस्था लवकरात लवकर सुरू होणे गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन, जिल्हाधिकारी मनपा आयुक्त,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांना जिल्ह्यातील शैक्षणिक व्यवस्था तातडीने सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पालक मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिले आहेत,
शिक्षण संस्थांचे परिसर स्वच्छ व निर्जंतुक करून घ्या
शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी सर्व वर्गखोल्या, शाळेचा परिसर येथील कार्यालये, स्वच्छ व निर्जंतुक करून करून घ्यावा, शाळांमध्ये मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था अनिवार्य करावी, शाळांमधून गरजेनुसार उपचारांच्या सुविधा उभाराव्या त्याचबरोबर जवळपासच्या रुग्णालयाची यासाठी मदत घ्यावी सर्वात महत्वाचे म्हणजे शिक्षण संस्था चालक, गाव पातळीवर शिक्षण समित्या, शिक्षक, पालक, आणि विद्यार्थी यांच्यामध्ये जागृती निर्माण करून त्यांना योग्य ती काळजी घेण्यास सांगावे. अशा सूचनाही पालकमंत्री देशमुख यांनी दिल्या आहेत,

देखरेखीसाठी स्वतंत्र व्यवस्था उभारावी
शिक्षणसंस्थांमध्ये प्रत्यक्ष शैक्षणिक उपक्रम सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी योग्य प्रकारची काळजी घेतली जाते की नाही याची देखरेख करणारी एखादी व्यवस्था निर्माण करावी असेही निर्देश त्यांनी दिले आहेत.