अखेर गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेना आघाडीची घोषणा

पणजी : आगामी गोवा विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना एकत्र लढविणार असल्याचे आज पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार प्रफुल पटेल आणि शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर केले.

राष्ट्रवादी काँग्रेसची १९९९ साली स्थापना झाल्यापासून गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना कार्यरत आहे. आमचे पहिले प्रदेशाध्यक्ष हे डॉ. विल्फ्रेड डिसुझा होते. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसने गोव्यातील प्रत्येक विधानसभा निवडणूक लढवली आहे. तसेच एकदा काँग्रेससोबत लोकसभा निवडणूकही लढवली होती, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विधानसभेसाठी याआधी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली होती. मात्र २०१७ सालापासून काँग्रेससोबत आमची आघाडी नाही. गोवा विधानसभेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व राहिले आहे. तसेच राष्ट्रवादीने अनेकदा मंत्रिपदही भूषविले आहे. राष्ट्रवादीने नेहमीच राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर पुरोगामी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांना एकत्र करुन निवडणूक लढवली आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेससोबत राष्ट्रवादीने १५ वर्ष कारभार चालवला आहे. तर मागील अडीच वर्षांपासून महाविकास आघाडीचा प्रयोग करत शिवसेना आणि काँग्रेससोबत आघाडी घडवून आणली आहे. केंद्रातही युपीएच्या माध्यमातून दहा वर्ष केंद्र सरकारमध्ये राष्ट्रवादीने आपले योगदान दिले असल्याचे प्रफुल पटेल यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी पक्षांना एकत्र आणण्याचा राष्ट्रवादीने नेहमीच प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने गोव्यात २०१७ साली काँग्रेसने आघाडीसाठी पुढाकार घेतला नाही. २०१७ च्या निकालानंतर गोव्यात काँग्रेस १७ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला होता. तर राष्ट्रवादीने एक जागा जिंकली होती. तसेच गोवा फॉरवर्ड पार्टीच्या आमदारांना सोबत घेऊन गोव्यात सरकार स्थापन करणे अतिशय सोपे होते. मात्र तसे झाले नाही, असेही ते म्हणाले. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठीही महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढविण्यासंबंधी काँग्रेससोबत चर्चा करत होतो. मात्र काँग्रेसकडून कोणतेही उत्तर आम्हाला प्राप्त झाले नाही. जागावाटपात आम्हाला जो सन्मान मिळायला हवा, तो मिळालेला नाही. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एकत्र येऊन गोवा विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. जागावाटपाबाबतचा निर्णय येत्या दोन तीन दिवसांत जाहीर करु, अशी घोषणा प्रफुल पटेल यांनी केली.