राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील उर्वरित पात्र शेतकऱ्यांना जुलै अखेरपर्यंत लाभ
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी १ हजार ३०६ कोटी निधी वितरित करण्यास मान्यता

मुंबई, दि. ८ : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत सन २०२०-२१  साठी ७ हजार कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पित केला आहे. या निधीतून यापूर्वी वितरीत केलेला निधी वगळता १ हजार ३०६ कोटी रूपये इतका निधी वितरीत करण्यास आज शासनाने मान्यता दिली आहे.आतापर्यंत राज्यातील २५.७७ लाख खातेदारांना  १६ हजार ६९० कोटी रुपयांच्या कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

दि.१ एप्रिल, २०१५ ते दि. ३१ मार्च, २०१९ पर्यंतच्या कालावधीसाठी अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या, तसेच, या कालावधीत अल्पमुदतीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन/फेरपुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९’ ही कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या योजनेची अंमलबजावणी सुरू असताना देशासह राज्यात कोविड-१९ चे महासंकट आले. त्यामुळे राज्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला. कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी निर्माण झाल्या आणि तिसऱ्या यादीतील पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास उशीर झाला होता.

या कर्जमुक्तीच्या अंमलबजावणीला आता गती देण्यात आली असून ज्या शेतकऱ्यांच्या आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्या पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे. जुलैअखेरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळेल असे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *